अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली
सरकारकडून विविध स्वरुपातील सुरु करण्यात आलेल्या नियमावलीच्या आधारे आर्थिक तंत्रज्ञान बाजार (फिनटेक) या क्षेत्रातील व्यवहार दिवसागणित वाढत असल्याचे दिसून येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. कराड हे उद्योग मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते.
साधारणपणे 2025 पर्यंत देशाचा फिनटेक क्षेत्रातील विस्तार हा तीन पटीने वाढून 6,20,700 कोटी रुपयावर पोहोचणार असल्याचेही कराड यांनी स्पष्ट पेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर गेल्या एक दोन वर्षात लॉकडाऊनच्या काळात मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच येणाऱया काळात फिनटेक कंपन्यांना महत्त्व प्राप्त होणार आहे.
2019 मध्ये भारताचा आर्थिक तंत्रज्ञान बाजार हा 1,920 अब्ज रुपये होता. हाच आकडा 2025 पर्यंत 6,207 अब्जवर पोहोचणार असल्याचा दावा व्यक्त केला आहे.
डिजिटल व्यवहारात भारत अव्वल
भारताचे डिजिटल व्यवहारातले स्थान हे अव्वल राहिले असून भारताची एकूण डिजिटल उलाढाल 25 अब्जच्या वर पोहचली असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान जनधनयोजनेच्या अंतर्गत असणाऱया बँक खात्यांपर्यंत डिजिलॉकर व यूपीआयसह अन्य टप्प्यावर मजबूत कामगिरी केल्याची माहिती आहे.