ठरणार एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल पटेल, क्रीडामंत्री रिजिजू यांना विश्वास
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय महिला फुटबॉल संघाकडे फारसे लक्ष दिले जात नसले तरी पुरुष संघाआधी त्याच सर्वप्रथम फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे.
2027 मध्ये होणाऱया महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ पात्र ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मताला पुष्टी देत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तशा प्रकारचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याची सूचना फेडरेशनला केली आहे. ‘महिला फुटबॉल संघाकडे तसे पाहिल्यास फार लक्ष दिले जात नाही. तरीही फिफाच्या मानांकनात भारताचा महिला संघ पुरुष संघापेक्षा वरच्या क्रमांकावर आहे, हे चांगले लक्षण आहे,’ असे पटेल म्हणाले. यू-17 महिला विश्वचषक संघासमवेत आभासी वार्तालाप करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी क्रीडामंत्री किरेन रिजिजूही उपस्थित होते. ‘या मुलींमध्ये अपेक्षित सुधारणा होत राहिली तर पुरुषापेक्षा त्याच आधी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील, असे मला वाटते. 2027 मध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेत त्या निश्चितच खेळताना दिसतील, अशी मला पूर्ण खात्री वाटते. त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे धोरण यापुढेही चालू राहणार असून भविष्यात विविध स्पर्धांमध्ये त्या नक्कीच भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसतील,’ असेही पटेल म्हणाले.
फिफा मानांकनात सध्या भारतीय महिला संघ 159 संघांमध्ये 55 व्या स्थानावर आहे. पुरुष संघ मात्र 210 संघांत 104 व्या स्थानावर आहे. रिजिजू यांनीही पटेल यांच्या मताशी सहमती दर्शविली आणि भारतीय महिला संघ भविष्यात विश्वचषकासाठी निश्चितच पात्र ठरेल, अशी आशा व्यक्त केली. ‘कनिष्ठ असो अथवा वरिष्ठ संघ असो, महिला संघ पुरुषांपेक्षा वरच्या क्रमांकावरच आहे. आम्ही यजमान नसलो तरीही विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची क्षमता आपल्या संघात आहे. त्यामुळे महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत आपला संघ खेळताना निश्चितच दिसेल, असा विश्वास मला वाटतो. पुरुष संघही पात्रता मिळविण्यात यशस्वी होईल, असेही आम्हाला वाटते,’ असे रिजिजू म्हणाले. 2027 च्या महिला विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याकरिता धोरणात्मक व परिपूर्ण आराखडा तयार करण्याची सूचना भारतीय क्रीडा प्राधिकरणचे सरसंचालक संदीप प्रधान यांनी एआयएफएफला केली आहे.
यावर्षी यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार होती. पण कोरोना महामारीच्या संकटामुळे ती आधी लांबणीवर टाकण्यात आली आणि नंतर ती रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र 2022 मध्ये होणाऱया स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. आताच्या यू-17 संघातील आठ मुलींचा जन्म 2005 चा असल्याने 2022 च्या महिला विश्वचषक स्पर्धेतही त्या भाग घेऊ शकतात. उर्वरित मुली मात्र 17 वय पार करणार असल्याने त्या सहभागी होऊ शकणार नाहीत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. 2022 मधील स्पर्धा ज्यांना हुकणार आहे, त्यांनी निराश होऊ नये. कारण त्यांना अन्य अनेक स्पर्धांत देशातर्फे खेळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यात यू-20 व वरिष्ठांच्या स्पर्धेचा समावेश आहे. तुम्हाला भविष्यात संधी मिळणार आहे, त्याची काळजी करू नये. आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, अशा शब्दांत पटेल यांनी त्यांना धीर दिला. 2022 मध्ये महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धाही भारतात होणार आहे.