आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फिरकीपटू म्हणून ज्याचा आदराने उल्लेख केला जातो अशा शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने त्याचे जीवन संपवले. 2 जानेवारी 1992 रोजी भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या वॉर्नची पंधरा वर्षांची कारकीर्द केवळ लक्षात राहणारीच होती असे नव्हे तर ती रोमहर्षकही होती. 1989 पर्यंत पाकिस्तानचा फिरकीपटू अब्दुल कादरची जादू संपूर्ण क्रिकेट विश्वावर होती. सचिन तेंडुलकर या त्याने बच्चा समजलेल्या खेळाडूने षटकारांचा पाऊस पाडून अब्दुल कादरची कारकीर्द संपवली. त्यानंतर उदय झाला तो शेन वॉर्नचा! वास्तविक भारतीय उपखंडातील क्रिकेटपटू फिरकी गोलंदाज व्हावेत यामध्ये फारसे नवल नाही. ही तर फिरकी गोलंदाजांची जन्मभूमीच. पण, जिथल्या खेळपट्टय़ा गतिमान गोलंदाजांना डोळय़ासमोर ठेवून बनवल्या जातात, जिथे शोधाल तिथे वेगवान गोलंदाजच सापडतो अशा ऑस्ट्रेलियामध्ये एक फिरकीपटू जन्माला यावा आणि तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटू ठरावा हे खरोखरच आश्चर्यकारक असेच होते. त्यामुळेच या गोऱया गोमटय़ा खेळाडूने भारतीय क्रिकेट रसिकांची मने जिंकली नसती तरच नवल. त्याने ऑस्ट्रेलियातर्फे 145 कसोटी सामने खेळत आपल्या भेदक लेगस्पिनच्या बळावर तब्बल 708 फलंदाज गारद केले. याशिवाय 194 एकदिवशीय सामन्यांमध्ये 293 बळी घेतले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत मुथय्या मुरलीधरन हा लंकन खेळाडू पहिला तर वॉर्न दुसरा आहे. या दोघांच्या नावाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका पार पडली. हा त्यांचा बहुमान मोठाच. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारताविरुद्ध पदार्पण केलेला हा खेळाडू. आपल्या पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध सिडनीत त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. एका विकेटसाठी त्याने तब्बल दीडशे धावा दिल्या ही त्याची सुरुवात होती. पण पुढे त्याने भरारी घेतली आणि पुढच्या पंधरा वर्षात तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. विस्डेनने बनवलेल्या यादीतील शतकातील सर्वोत्तम पाच खेळाडूंपैकी तो एक ठरला. पदार्पणाच्या दुसऱयाच वषी 1993 साली ओल्ड ट्रफर्ड कसोटीत इंग्लंडचा महान फलंदाज माईक गॅटिंगचा त्रिफळा उडवला. शतकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून तो चेंडू गणला जातो! लेग स्टम्पच्या रोखाने पडलेला चेंडू खरे तर बाहेर जाणार म्हणून गॅटिंगने तो बचावाच्या पद्धतीने खेळू पाहिला. पण डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच तो चेंडू अचानक हातभर आत वळला आणि त्याने गॅटिंगचा त्रिफळा उडवला. हे कसे घडले याच्या विचारातच गॅटिंग गुंतून पडला. त्याच्या सातशे आठ विकेटपैकी तब्बल सव्वातीनशे म्हणजे निम्म्या विकेटस् त्याने इंग्लंड आणि आफ्रिकेविरुद्ध घेतल्या आहेत. 2008 साठी भारतात आयपीएलचा प्रारंभ झाला. त्याच्या पहिल्या सिझनचा विजेता राजस्थान संघ होता. त्या संघाचे नेतृत्व शेन वॉर्नने केले होते. त्यानंतर पुन्हा कधीही राजस्थान जिंकलेला नाही हे विशेष. 1999 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात तो ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. हा विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. ऍशेस क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही गोलंदाजापेक्षा सर्वाधिक 195 बळी घेणारा तो खेळाडू होता. क्रिकेटमधला गुड बॉय म्हणून त्याची ख्याती असली तरी त्या जगता बाहेर तो बॅड बॉय म्हणूनही बदनाम झाला. 2003च्या विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीस तो उत्तेजक चाचणीत दोषी ठरला आणि त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तो विश्वचषक सुद्धा ऑस्ट्रेलियाने जिंकला मात्र त्यामध्ये वॉर्न नव्हता. 1998 मध्ये बुकीकडून पैसे घेऊन गोलंदाजी केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्याला एक वर्ष खेळापासून दूर ठेवले होते. तरीसुद्धा त्याच्या खेळाने त्याच्या या सर्व दुर्गुणांवर पांघरूण घालण्याचे काम केले. तब्बल 18 वर्षे ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगावर राज्य केले. त्याकाळात वॉर्न या संघाचा एक प्रमुख खेळाडू होता. क्रिकेटच्या इतिहासात प्रत्येक काळात दोन वेगळय़ा संघातील गोलंदाज आणि फलंदाजातील द्वंद्व पाहायला क्रिकेट रसिकांना आवडते. तसे शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर नेहमी समोरासमोर उभे राहिले. पण 1998 मध्ये शारजात झालेल्या तिरंगी मालिकेत सचिनने केलेली त्याची धुलाई खूपच गाजली. मला स्वप्नातसुद्धा सचिन षटकार मारतोय असे दिसते असे निःसंदिग्धपणे त्याने बोलून दाखवले होते. एकाच दिवशी ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले. ऑस्ट्रेलियाचे महान एसटी रक्षक आणि फलंदाज रॉड मार्श यांचे निधन झाल्यानंतर शेन वॉर्नने शुक्रवारी दुपारी आपणास दुःख झाल्याचे ट्विट केले होते. पण ते अंतिम ठरेल अशी कल्पना कोणासही आली नाही. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याला कायमचे थांबवले. चेंडूला बोटावर नाचवणारा असा हा महान फिरकी सम्राट अचानक या जगातून निघून गेला. मैदानावरील त्याचे अस्तित्व भारतीय रसिकांना स्फुरण चढवणारे ठरायचे तर भारतीय रसिक कधी, कधी त्याचा रागसुद्धा करायचे. मात्र त्याच्या गोलंदाजीवर सारे क्रिकेट विश्व फिदा होते. शाहिद आफ्रिदीने त्याला फिरकी गोलंदाजीचे विद्यापीठ म्हटले आहे. तर सचिनने शेन वॉर्नची उणीव जाणवत राहील अशी भावना व्यक्त केली आहे. खरोखरच त्याने जगाचा निरोप घेतला यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण हे जग सोडण्याची फिरकीसुद्धा त्याच्या कारकिर्दीला साजेशी अशीच म्हणावी लागेल. त्याची आठवण क्रिकेटच्या इतिहासात कायम राहणार आहे. अवघ्या पंधरा वर्षांची त्याची कारकीर्द पण ती जगाच्या प्रदीर्घ काळपर्यंत आठवणीत राहील. आयुष्यातील कठीण प्रसंगातसुद्धा तो सहजच जगत राहिला आणि संकटानंतरसुद्धा त्याने यशस्वी पुनरागमन केले. त्याच्या आयुष्याकडून घेण्यासारखा धडा तो हाच. आयुष्यात जर कामगिरी दमदार असेल तर आपल्या काही चुकासुद्धा जग सहज विसरते आणि त्या पोटात घालून पुन्हा लढण्याची संधी देते. तशी संधी रसिकांनी त्याला नेहमीच दिली आणि त्या संधीचे त्याने सोने केले. जागतिक क्रिकेटला रोमहर्षक बनवण्यात अनेक खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. त्यात हा फिरकी सम्राटही आहे. त्याच्यासाठी अखेरचा निरोप हे तसे औपचारिक शब्द. पण या औपचारिकतेच्या पलीकडे असलेला त्याचा खेळ मात्र अजरामर राहणार आहे.
Trending
- नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी भाजपमध्ये; आमदार सतेज पाटील गटाला धक्का
- आरोप, प्रत्यारोप नको, शाश्वत विकासावर बोला ! जाणकार मतदारांचे उमेदवारांसह नेत्यांना आवाहन
- विद्यापीठ अंतर्गत 26, 27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- जोतिबाच्या सेवेत गुरव समाजाची सात कुटुंबे! जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरातील परंपरा
- प्रश्नच प्रश्न चोहीकडे…गेला खासदार कुणीकडे..? मुकुंदराव देसाई यांचा सवाल
- भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर
- रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!
- मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत; चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन