ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
फिलिपाइन्समध्ये राई चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. वादळामुळे आतापर्यंत जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. 13 जण जखमी असून, 10 जण अद्याप बेपत्ता आहेत.
बोहोल प्रांताचे गव्हर्नर आर्थर याप यांनी सांगितले की, या चक्रीवादळामुळे त्यांच्या प्रांतात 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील आकडा 100 वर पोहचला आहे. राई’ चक्रीवादळामुळे 3 लाखांहून अधिक लोकांना त्यांची घरं आणि बीच रिसॉर्ट सोडावे लागलेले आहेत. अनेक भागात दळणवळण आणि वीज सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि घरांची छत कोसळल्याने गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी मोठा विध्वंस झाला आहे, तिथे लोकांना अन्न-पाणी पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चक्रीवादळाने गुरुवारी आणि शुक्रवारी फिलिपाईन्सच्या मध्यवर्ती भागाचे प्रचंड नुकसान केले आहे. जवळपास 7 लाख 80 हजार लोकांचा या वादळाचा फटका बसला असून, 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.