ऑनलाईन टीम/तरुण भारत
नवी मुंबईतील जागतिक दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचे रविवारी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच “आजचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री म्हटल्यानंतर राज्यासाठी कामे करणे येतेच. पण ही रस्ते, पाणी आणि इतर कामे करत असताना आपण एका गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करतो असं मला नेहमी वाटतं. जगावं कसं हेच आपण विसरून जातो. जगण्यासाठी खेळाची गरज आहे. हल्ली मैदानी खेळ मागे पडत चालले होते त्यांना आपण प्रोत्साहन देत आहोत. आयटी क्षेत्रामध्ये विकास होत असताना आपण आपल्या मातीपासून दूरावत चाललो आहोत. त्यामुळे आता आपण ज्या मातीपासून आपलं नातं तुटतं चाललं होतं ते आता आपण पुन्हा जोडतो आहोत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.