’जागोर’ मधून राहुल गांधींची गर्जना सुवर्णभूमी काळवंडवू देणार नाही
प्रतिनिधी/ पणजी
फुटीरांसाठी काँग्रेसचे दरवाजे कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून अशा विश्वासघातक्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी जोरदार घोषणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेसजनांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले. तसेच ‘कोळसा हब’ च्या नावाखाली सुवर्णमयी गोव्याचा चेहरा कोळशाने काळवंडवू देणार नाही व कायदेशीर मार्गाने गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाहीही श्री. गांधी यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा भेटीवर आलेले राहुल गांधी यांनी शनिवारी दिवसभरात राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. गोव्यातील मच्छीमारांशी संवाद साधला, भाडोत्री मोटरसायकलवर बसून पणजीत फेरफटका मारला, दुपारी बांबोळी येथे खुर्साकडे एका रेस्टॉरंटमध्ये गोमंतकीय शीत-कढीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
त्यानंतर सायंकाळी बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये आयोजित ‘जागोर’ महासभेत गोमंतकीयांच्या काळजाला हात घालणारे भाषण केले. त्यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, रमाकांत खलप, खासदार फ्रान्सिस सार्दिन, दिनेश गुंडूराव, पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर, आलेक्स सिक्वेरा, आलेक्स लॉरेन्स, बिना नाईक, वरज म्हार्दोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप सरकार उद्योगपतींच्या हितासाठीच
पुढे बोलताना श्री. गांधी यांनी केंद्र तसेच गोव्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार केवळ पाच ते सहा उद्योगपतींच्या हितासाठीच झटत असून गरीबांच्या तोंडचा घास हिसकावून श्रीमंतांना भरवण्याचे पाप करत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ चे आश्वासन देऊन भारतीयांवर मोहिनी घातली. परंतु प्रत्यक्षात अच्छे दिन कुणाचे आले? याचा विचार कुणी केलाय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या राजवटीत गेल्या दहा वर्षात देशात सर्वाधिक बेकारी वाढली आहे. गत वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत, रस्त्यावर प्राण सोडत आहेत, पेट्रोल-डिझेलची महागाई गगनाला भिडली आहे, लोक कंगाल झालेले आहेत, आणि सरकार मात पाच ते सहा उद्योगपतींच्या दावणीला बांधल्यासारखे काम करत आहे. या सरकारला माणुसकी नाही, दयामाया नाही, असे गांधी म्हणाले.
देशातील विमानतळे, पोर्ट, खाणी, कोळसा, टेलिकॉम यासारखे सर्व प्रमुख उद्योग अदानीच्या घशात घातले जात आहेत. एवढेच नव्हे तर करप्रणालीत लहान उद्योग, व्यावसायिक, शेतकरी आणि असंघटीत सेक्टर कसे भरडले जातील व स्वमर्जीतील सदरचे पाच ते सहा उद्योगपतींना कसा फायदा मिळेल याची योग्य गणिते मांडूनच जीएसटीची रचना करण्यात आली आहे, असा आरोप गांधी यांनी केला.
गोव्याला प्रगतीच्या दिशेने नेणार
अशावेळी आता लोकांनी भाजपला हद्दपार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच काँग्रेसला संधी मिळाल्यास गोमंतकीयांच्या सर्व समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार, गोव्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार, कोणत्याही परिस्थितीत गोव्यात कोळसा हब बनू देणार नाही, तिन्ही लिनीयर प्रकल्प रद्द करणार अशा अनेक घोषणाही केल्या.
नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देणार ः चोडणकर
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बोलताना, काँग्रेसला हरविण्याची ताकद भाजपमध्ये नाही. म्हणूनच अनेक पक्षांना गोव्यात आणून मतविभाजन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचा विश्वासघात करणाऱयांना यापुढे दारे कायमस्वरुपी बंद असतील असे सांगतानाच येत्या निवडणुकीत तरुण आणि नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देणार असल्याची घोषणा चोडणकर यांनी केली.
लोकांवर लाचारीचे जीवन जगण्याची वेळ ः कामत
दिगंबर कामत यांनी बोलताना एका सरकारच्या भ्रष्टाचाराचा खुद्द एक राज्यपाल पर्दाफाश करतात यासारखे दुर्दैव नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांना जरा तरी नैतिकता असती तर एव्हाना त्यांनी राजीनामा दिला असता. परंतु हे सरकार निंदा, आरोप किंवा टीकेलाही जुमानत नाही, अशी टीका केली. 2007 ते 2012 या दरम्यान काँग्रेसचे सरकार असताना राज्यातील जनता ऐश्वर्यसंपन्न होती, त्यानंतरच्या पुढील 10 वर्षात लोकांवर लाचारीचे जीवन जगण्याची वेळ या सरकारने आणली आहे, असे कामत म्हणाले.
विद्यमान सरकारच्या काळात सर्वाधिक आंदोलने झाली आहेत. यावरून हे सरकार प्रत्येक गोमंतकीयावर आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणत आहे. काँग्रेसने अशी पाळी कधीच आणली नव्हती, असा दावा त्यांनी केला. राज्यातील एकुण एक रस्त्याची दैनावस्था झाली आहे. खाण परिसरातील लोकांना या सरकारने देशोधडीला लावले आहे आणि हे सरकार विकासाच्या बाता मारत आहेत. निदान आता तरी लोकांनी शहाणे होऊन या सरकारला सत्तेबाहेर फेकावे, असे आवाहन कामत यांनी केले.
आमदार आलेक्स लॉरेन्स यांनी स्वागत केले. अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही विचार मांडले. श्री. गांधी यांच्याहस्ते फुटबॉल जर्सीचे अनावरण करण्यात आले. तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.