महानगरपालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्षच : विहिरी व कूपनलिकेचे पाणी झाले दूषित
प्रतिनिधी / बेळगाव
फुलबाग गल्ली येथे महिन्यापासून गटारीचे पाणी तुंबले आहे. तुंबलेले पाणी थेट परिसरातील विहिरींमध्ये गेल्याने विहिरी व कूपनलिकेचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून, गटारींची स्वच्छता करावी यासाठी मनपाकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु या समस्येकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शहर एकीकडे स्मार्ट होत असताना दुसरीकडे मात्र प्राथमिक समस्या जैसे थे आहे. फुलबाग गल्ली चौथा क्रॉस येथे गटारींची स्वच्छता केली नसल्याने पाणी तुंबले आहे. महिन्याभरापासून पाणी तसेच असल्याने त्यामध्ये कीड झाली आहे. आता हे पाणी विहिरींमध्ये झिरपू लागले आहे. विहिरींचे पाणी दूषित होत असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याकडे मनपाने लक्ष पुरवून गटारींची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
दाद मागायची कोणाकडे?
परिसरातील गटारी तसेच चेंबर यांची वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने गटारींमध्ये पाणी तुंबले आहे. तुंबलेल्या गटारींच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील विहिरी व कूपनलिकेचे पाणीही दूषित झाले आहे. याबाबत तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याने दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न लक्ष्मीबाई चौगुले यांनी उपस्थित केला.
रोगराई पसरण्याची भीती
फुलबाग गल्ली, चौथा क्रॉस येथे मागील महिन्याभरापासून ही समस्या भेडसावू लागली आहे. परिसरात असणाऱया सर्वच गल्ल्यांमधील पाणी दूषित झाल्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशाप्रकारे अस्वच्छतेचे दर्शन घडत असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिक उत्तम पाटील यांनी व्यक्त केली.
गलिच्छ वातावरणात राहण्याची वेळ
पाणी तुंबल्याने डासांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गलिच्छ वातावरणात राहण्याची वेळ आली आहे. स्वच्छता कर्मचाऱयांना सांगूनही स्वच्छता केली जात नसल्याने शांता रेडेकर यांनी संताप व्यक्त केला.