बेंगळूर : सरकारी सभा-समारंभ, कार्यक्रमांमध्ये हार-तुरे, पुष्पगुच्छ, शाल, भेटवस्तू, स्मृतिचिन्हे देण्यावर निर्बंध घालण्यासंबंधीचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला होता. मात्र, या आदेशामुळे फुलशेती करणारे आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱयांना फटका बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा आदेश तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी फुले उत्पादकांनी केली आहे. यासंबंधी गुरुवार दि. 12 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व फुले उत्पादक आणि फुले विक्री संघटना बेंगळूरमधील आंतरराष्ट्रीय फ्लॉवर मार्केटसमोर सकाळी 11 वाजता पुष्पगुच्छ, हार, फळांच्या टोपल्या घेऊन आंदोलन करणार आहेत.
मंगळवारी बेंगळूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. तसेच हा अनावश्यक खर्च असून यापुढे सरकारी कार्यक्रम, सभा-समारंभांमध्ये हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊ नयेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांना यासंबंधीचे आदेशपत्रक जारी करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला होता.