कोल्हापूर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले यांनी मानवी प्रतिष्ठेसाठी संघर्ष आणि लेखन केले. स्त्राr-पुरुष समानतेचा विचार मांडणारे तृतीयरत्न हे मराठीतील पहिले सामाजिक विचारनाटय़ होते. गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी भारतातील दोन परंपरांच्या सांस्कृतिक संघर्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मानसिक गुलामगिरीतून माणूस मुक्त झाला पाहिजे फुलेंचा विचार होता. फुलेंचे साहित्य म्हणजे मानव मुक्तीचा मार्ग होता, असे प्रतिपादन डॉ. छाया पोवार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने फुले शाहू आंबेडकर सप्ताह अंतर्गत महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘महात्मा जोतिराव फुले यांचे मानवतावादी साहित्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.
डॉ. पोवार म्हणाल्या, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा यातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध रोमांचकारी प्रसंग उभे केले. त्यामुळे त्यांना आधुनिक युगातील पहिले शाहीर असे म्हटले जाते. अंधश्रद्धा, अवतार कल्पना व खोटय़ा समजूती यावर फुल्यांनी हल्ला चढविला. मिथकांची चिकित्सा केल्यामुळे बौद्धिक गुलामगिरी कमी होऊ लागली. फुल्यांनी शेतकऱयांचा असुड या ग्रंथामध्ये शेतकऱयांच्या शोषणाचे बारकाईने विश्लेषण केले. शेततळी बांधून पाणी शेतीला पुरवावे आणि सामाजिक राजकीय व्यवस्था शेतकऱयांच्या गुलामीत कशी कारणीभूत आहे याविषयी माहिती दिली. मानवी जीवन, आदर्श कुटुंब, आदर्श समाज कसा घडवावा यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाची निर्मिती केली. त्यामध्ये मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे नियम उद्धृत केले.
अध्यक्ष्यस्थानावरून डॉ. महाजन म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्राr पुरुष समानता, स्वातंत्र्य, शिक्षणाची गरज, शेतकऱयांचे प्रश्न या अनुषंगाने जातीभेद नष्ट व्हावा. मानवी समाज अंधश्रद्धामधून आणि कर्मकांडाच्या जाचातून मुक्त व्हावा म्हणून फुल्यांनी साहित्याची निर्मिती केली. डॉ. दीपा श्रावस्ती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. अमोल मिणचेकर यांनी आभार मानले. प्रा. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी शिक्षक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते.