पुणे / प्रतिनिधी :
काळानुसार सर्व सामाजिक व्यवहारांमध्ये बदल झाले आणि त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसायात देखील बदल झाले आहेत. हा बदल होणे देखील अपेक्षित असते. परंतु फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कमी होत आहे. हा वर्ग मेडिकल प्रॅक्टीसचा पाया आहे आणि तो राहिला पाहिजे. गेल्या काही वर्षात कुटुंब वैद्यक संस्था लयाला गेली. यामध्ये बदल घडवायचा असेल तर फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा राबविली गेली पाहिजे आणि भक्कम केली पाहिजे, असे मत आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
ग्राहक पेठ व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मी फॅमिली डॉक्टर, आरोग्यावर बोलतो काही या टॉक शोचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता शाळेच्या गणेश सभागृहात करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप देवधर, ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक, विश्वास देसवंडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. टॉक शोमध्ये फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचे कमी होणारे प्रमाण, फॅमिली डॉक्टरचे महत्व, आजच्या लाईफस्टाइलमुळे होणारे आजार, आजारांविषयी पसरलेल्या अफवा अशा अनेक विषयांवर उहापोह करण्यात आला.
डॉ. दिलीप देवधर म्हणाले, आज बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रगत तंत्रज्ञानामुळे फॅमिली डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून त्यांच्याकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. फॅमिली डॉक्टरची महत्वाची भूमिका ही रुग्णांना मार्गदर्शन करणारी असते. रुग्णांच्या शारीरिक आजारांबरोबर त्यांचे मन देखील त्यांना कळते. फॅमिली डॉक्टर हे साध्य आजारात तुमचे मित्र असतात, कष्टसाध्य आजारात मार्गदर्शक असतात आणि असाध्य आजारात तत्वज्ञ असतात, त्यामुळे फॅमिली डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू नका.
सूर्यकांत पाठक म्हणाले, आरोग्यसंपन्न जीवनासाठी डॉक्टरांची साथ गरजेची आहे. जन्मपासून ते मृत्युपर्यंत टप्याटप्यावर प्रत्येकाला डॉक्टरांची आवश्यकता असते. आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून काम करणा-या डॉक्टरांची आज आवश्यकता आहे. डॉक्टरी पेशाला व्यावसायिकपणा आल्याने समाजातील चित्र वेगळे आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा रुजविण्याकरीता आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.