खासदार उदयनराजे उपरोधिक टीका : लॉकडाऊनवरुन जिल्हाधिकाऱयांची घेतली भेट
प्रतिनिधी / सातारा
आतापर्यंत जगभरात एडस, स्वाईन फ्ल्यू, प्लेगसारख्या अनेक साथी येवून गेल्या मात्र त्यावर मात जगरहाटी चालतच राहिली. कोरोना संसर्गावर वारंवार ज्या पध्दतीने शासन, प्रशासन निर्णय बदलून लोकांचा अंत पहात आहे हे आता थांबवा. कोरोनाला कसा संपवायचा याचा आरोग्य संशोधकांनी करायचा आहे. ते काही बोलेनात आणि प्रशासनाकडून लॉकडाऊनचा उपाय केला जात आहे. त्याची काही गॅरंटी आहे का? असा सवाल करता खासदार उदयनराजे भोसले यांनी जर फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लस कमी पडली नसती, अशी उपरोधिक टीकाही माध्यमांशी संवाद साधताना केली.
जिल्हय़ात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यापारी तसेच जनतेच्या भावना मांडण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत व्यापाऱयांचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.
खासदार उदयनराजे यांनी कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लाकडाऊनसारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर बुडणाऱया रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनतेत कमालीची अस्वस्थता आहे. हे निर्बंध घालताना सरकारने विविध क्षेत्रांतील परिणामांचा अजिबात विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय, फेरीवाले, गॅरेजवाले, या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना विशिष्ट नियमावली घालून देवून त्यांचा रोजगार सुरू ठेवावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
कोरोनाबाबत संशोधकांना ठरवू द्या
लॉकडाऊन करा, घरात बसा. रोजगार नाही मग खायला अन्न नाही अशी काही नागरिकांची अवस्था आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये अचानकपणे लॉकडाऊन झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे नागरिक पॅनिक झालेत. कोरोनाविषयी महसूल खाते, पोलीस खाते कसे काय ठरवत आहे. मेडिकल सायन्समधील मोठे संशोधक देशात आहे त्यांना ठरवू द्या. कोरोना येण्याला काय जनता जबाबदार आहे का? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याची मागणी
माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की, सरकारने पुन्हा विचार करून तसेच व्यापारीवर्गाशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरीबांचे जीवन आणि अर्थकारणाला बाधा होणार नाही याचा विचार करावा. शेतमाल तसेच औद्योगिक मालाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी वाहतूक सुरू ठेवावी. तसेच संपूर्ण लाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.