बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून फेब्रुवारी महिन्यात 38 हजार 122 नागरिकांनी विमान प्रवास केला आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या महिन्यात एकूण 716 विमानांच्या फेऱ्या झाल्या असल्याची माहिती विमान प्राधिकरणाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
बेळगाव विमानतळावरून मुंबई, बंगळूर, पुणे, हैद्राबाद, तिरुपती, कडप्पा, इंदूर, जयपूर, अहमदाबाद या शहरांना विमानसेवेने जोडण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव व परिसरातील नागरिकांचा विमानसेवेकडे ओढा आहे. इंडिगो, स्पाइस जेट, तृजेट, स्टार एअर व अलाइन्स एअर या कंपन्या सेवा देत आहेत. पुढील मोसमात अजून काही शहरांना विमानसेवा देण्यात येणार आहे.
मागील वर्षी याच महिन्यात केवळ 3 हजार 932 नागरीकांनी विमान प्रवास केला होता. त्यामुळे वर्षभरात विमानतळाने मोठी कामगिरी केली आहे. पुढील काही महिन्यांत 40 हजारांचा प्रवासी टप्पा गाठेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.