प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळातील निर्बधांच्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांना राज्यशासनाने 1 हजार 500 रूपयांची घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रक्कमेत सातारा नगरपरिषदेच्या स्वनिधिमधून आणखी 1 हजार रूपये प्रतिफेरीवाला देण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, साताऱयातील फेरीवाल्यांचे आवश्यक ते सर्वेक्षण यापूर्वीच झालेले आहे. फेरीवाल्यांप्रती सहानुभुतीमुळे टिका करणाऱयांनी याबाबतची थोडीतरी माहीती घेतली असती तर वस्तुस्थिती त्यांना समजली असती. सध्याच्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत, अकारण संभ्रमावस्था निर्माण होण्यास हातभार न लावता, आवश्यक असेल तेथे संबंधीतांनी प्रशासनास यथोचित सहकार्य करावे अशी आमची सर्वाना विनंती राहील.
फेरीवाल्यांसह गोरगरिब नागरीक आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना पात्र लाभ देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. सातारा नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान होणार नाही.
सातारा नगरपरिषद आणि फेरीवाला संघटना यांच्या संयुक्त माध्यमातुन सातारा शहरातील 1 हजार 621 पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. त्यापैकी मा.पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमधुन सन 2020-21 मध्ये 754 पथविक्रेत्यांचे खात्यात रुपये 10 हजारांची रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. तर या व्यतीरिक्त 867 फेरीवाल्यांची प्रकरणे मंजूर असून, रक्कम प्रदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. मा.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली रुपये 1500/- ची फेरीवाला मदत संबंधीत पात्र पथविक्रेत्यांना प्रदान करण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याकामी शासनाचे निर्देश ज्या प्रमाणे प्राप्त होतील. त्यानुसार फेरीवाल्यांना रुपये 1 हजार 500 नुकसान रक्कम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन प्रदान केले जातील. सध्याची आपत्कालीन परिस्थिती पहाता, टिका करणाऱयांना नीट माहीती मिळाली असती तर त्यांनी अशी टिका केली नसती हे आम्ही जाणतो. म्हणूनच केलेल्या टिकेला सकारात्मकतेने खुलासा वजा माहिती देत आहोत.
आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही
तसेच राज्यशासनाने रुपये 1500/- रुपयांची घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रक्कमेत सातारा नगरपरिषदेच्या स्व निधिमधून आणखीन रक्कम रुपये 1000/- प्रतिफेरीवाला देण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शासन घोषणेप्रमाणे रुपये 1500/- आणि नगरपरिषदेचे रुपये 1000/- अशी दिलासा रक्कम पात्र फेरीवाल्यांना लवकरच प्रदान केली जाईल. कोणतीही पात्र व्यक्ती आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही.