आमदार रवी नाईक यांची मागणी : कामातील दिरंगाई व खर्चाचा तपशिल द्या
प्रतिनिधी / फोंडा
फोंडय़ात सुरु असलेले मलनिस्सारण प्रकल्पाचे काम चार वर्षानंतरही अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामामुळे गेली तीन वर्षे फोंडय़ातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली असून लोकांना जीव धोक्यात घालून वाहने हाकावी लागत आहेत. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून कितीकाळ लागणार व त्यावर आत्तापर्यंत किती खर्च झाला याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री किंवा बांधकाममंत्र्यानी द्यावे. मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामात अनेक तांत्रिक दोष आहेत, त्यामुळे दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी केली आहे.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. फोंडा पालिका क्षेत्रासह कवळे, बांदोडा व कुर्टी पंचायत क्षेत्रात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरु आहे. कुर्टी पंचायत क्षेत्रात सरकारने जमिन ताब्यात न घेताच पाईप्स व इतर साहित्य खरेदी करुन कामाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचे भू सर्वेक्षण योग्य पद्धतीने झालेले नाही. भू पातळी लक्षात न घेताच प्रकल्पासाठी मोठय़ाप्रमाणात चेंबर्स खोदण्यात आले आहेत. या चेंबर्ससाठी एकाच जागी कितीवेळा खड्डे खोदले गेले याचा हिशेब मिळत नाही. त्यामुळे एकंदरीत प्रकल्पाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे रवी नाईक म्हणाले.
अजून कितीकाळ प्रकल्पाचे काम चालणार
प्रकल्पाचे काम सन 2016 मध्ये सुरु झाले होते व ते पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा होती. आज चार वर्षे उलटली तरी काम पूर्ण झालेले नाही. 27 जुलै 2018 रोजी विधानसभा अधिवेशनात आपण या प्रकल्पाच्या कामासंबंधी प्रश्न विचारला होता. तत्कालीन बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यावर उत्तर देताना प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे सांगून मे 2019 पर्यंत ते पूर्ण होणार असल्याचे उत्तर दिले होते. या गोष्टीला आता वर्ष पूर्ण झाले, तरीही प्रकल्प पूर्ण होताना दिसत नाही, असे रवी नाईक यांनी सांगितले.
यंदाच्या पावसातही खड्डय़ावाचून सुटका नाही
मलनिस्सारण प्रकल्पामुळे गेली चार वर्षे फोंडय़ातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण रखडून पडले आहे. खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे दर पावसाळय़ात वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यंदाच्या पावसाळय़ातही फोंडय़ातील जनतेची रस्त्यांवरील या खड्डय़ांपासून सुटका नाही. विलंबित मलनिस्सारण प्रकल्पाने जनतेला वेठीस धरल्याचा आरोपही रवी नाईक यांनी केला.
कोरोनाबाधींचा वाढता आकडा चिंताजनक
राज्यात ज्या गतीने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, ती अत्यंत काळजीची बाब आहे. चेकनाके व रेल्वेतून येणाऱया प्रवाशांवर कुठलेच नियंत्रण नसल्याचे हे परिणाम आहेत. चेकनाक्यांवर सुरक्षा कडेकोट करतानाच कोविड चाचणीसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करण्याची गरज आहे, असे रवी नाईक म्हणाले. मजुरांच्या स्थलांतराविषयी बोलताना, सरकारने लॉकडाऊनच्या काळात मजुरांची योग्य काळजी घेतली नाही. त्यांना चांगले जेवण व खर्चासाठी थोडीशी रक्कम दिली असती, तर त्यांनी गावात जाण्याची घाई केली नसती. गोव्याच्या विकासासाठी या मजुरांनी दिलेल्या श्रमाचे मोल लक्षात घेऊन त्यांना योग्य वागणूक मिळायला हवी होती.
फोंडा तालुक्याला कोरोना संसर्गाचा वाढता धोका आहे, असे सांगून फर्मागुडी येथे उभारण्यात आलेली क्वारंटाईन केंद्रे नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचे ते म्हणाले. फर्मागुडी परिसर हे शैक्षणिक हब आहे. तेथे अनेक शिक्षण संस्था कार्यरत असताना तेथे आणल्या जाणाऱया कोविड संशयित रुग्णांच्या देखरेखीविषयही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
सर्व चाळीसही आमदारांना चर्चेसाठी बोलवा
सध्य परिस्थितीवर चर्चा व विचारविनिमय होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व चाळीसही आमदारांना विश्वासात घेऊन उपाययोजनासंबंधी चर्चा करण्यासाठी एकदिवशीय अधिवेशन बोलावण्याची लेखी मागणी आपण यापूर्वीच केली आहे. मात्र मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना विश्वासात न घेता, केवळ सत्ताधारी आमदारांनाच बैठकांना निमंत्रित करीत आहेत, हे योग्य नाही. लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आमदारांना अशा परिस्थितीत चर्चेसाठी बोलावणे सरकारचे कर्तव्य बनते असे रवी नाईक म्हणाले.