प्रतिनिधी/ सातारा
रक्तदान हे जगात सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. याच रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचवले जातात. वेळेला रक्तदाता मिळणे अवघड असते.परंतु साताऱयात युवकांनी सुरु केलेली रक्तदानाची चळवळ आता महाराष्ट्रभर पोहचली आहे. तब्बल 12 हजार रक्तदाते युवा मोरयाशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्रातून कोठूनही रक्ताची गरज भासल्याचा फोन येताच लगेच रक्तदाता हजर केला जातो किंवा रक्ताचा पुरवठा केला जातो, अशी माहिती युवा मोरयाचे विक्रांत देशमुख यांनी दिली.
सातारा शहरात 2012 मध्ये रक्तदानाचे महत्व ओळखून रक्तदान चळवळ सुरु केली. शहरात व जिह्यात ज्यांना रक्ताची गरज लागेल त्याला लगेच रक्ताचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रक्तदान चळवळीची माहिती ज्यांना ज्यांना मिळाली ज्यांना ज्यांना पटत गेली ते ते या चळवळीशी जोडत गेले आणि महाराष्ट्रभर रक्तदानांची एक मोठी चळवळ तयार झाली आहे. फोन येताच तात्काळ रक्तदाता उपलब्ध करुन दिला जातो. आतापर्यंत 1900 जणांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे. युवा मोरयाच्या माध्यमातून 743 रक्तदान शिबिरे घेतली आहेत. दहा हजार रक्तदाते महाराष्ट्रात आहेत, अशी माहिती युवा मोरयाचे विक्रांत देशमुख यांनी सांगितले.