भाजपकडून जोरदार टीका- प्रियंका-राहुल यांना विचारले प्रश्न
वृत्तसंस्था/ जयपूर
फोन टॅपिंग प्रकरणी भाजपची आक्रमक भूमिका कायम आहे. भाजपकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजधानी जयपूरपासून दिल्लीपर्यंत घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि जयपूर ग्रामीणचे खासदार राज्यवर्धन सिंग राठौड यांनी गेहलोत सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजस्थानातील गेहलोत सरकारला बलात्काराच्या घटना रोखण्यास अपयश आले आहे. तसेच जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी काँग्रेस सरकारकडे वेळ नसल्याचा आरोप भाजप खासदाराने मंगळवारी केला आहे.
गेहलोत सरकारचे लक्ष जबाबदारी पार पाडण्याऐवजी स्वतःची सत्ता वाचवू पाहत आहे. काँग्रेस सरकारने विधानसभेत फोन टॅपिंगची बाब मान्य केले आहे. फोन टॅपिंग झाले असल्यास मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे अशोक गेहलोत यांनीच जाहीरपणे सांगितले होते. फोन टॅपिंग का केले जात होते हे काँग्रेसने जाहीर करावे. सरकार स्वतःच्याच जनतेची हेरगिरी करत आहे. या फोन टॅपिंगच्या माध्यमातून कुठले गुंड पकडले हे राजस्थान सरकारने सांगावे असे आव्हान भाजप नेत्याने दिले आहे.
काँग्रेसवर शरसंधान
राज्यवर्धन राठौड यांनी पत्रकार परिषदेत फोन टॅपिंगसह राजस्थानात होणाऱया बलात्काराच्या घटनांवरही प्रश्न उपस्थित केले आहे. राजस्थानात सातत्याने बलात्काराच्या घटना घडत आहेत. पण प्रियंका वड्रा अन् राहुल गांधी सोयीस्करपणे मौन बाळगून आहेत. तेथे जाणे दूरच राहिले, दोघांनी एक ट्विटही केला नाही. केवळ हाथरस-हाथरस करण्यातच राहुल यांनी वेळ घालविल्याचे राठौड यांनी म्हटले आहे.