धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर, सदर कामगारांपर्यंत जीवनावश्यक वस्तू कशा पोहोचल्या नाहीत ः आशेंद्र वेळीप यांचा सवाल
प्रतिनिधी / कुडचडे
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले व सर्व कामगार, अन्य गरजू व्यक्ती तसेच परप्रांतीयांना जेवण व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. पण सदर मदतीचा हात पाच वर्षांआधी कुड्डेगाळ येथील फोमेन्तो कंपनीने कामावरून हटविलेल्या 219 कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही अशी कैफियत घेऊन सदर कामगारांकडून गोवा खाण कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱयांना उद्देशून लिहिण्यात आलेले निवेदन धारबांदोडाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांना सुपूर्द करण्यात आले आहे.
ज्या फोमेन्तो कंपनीसाठी 219 कामगारांनी घाम गाळला त्या कामगारांना कोणतीच मदत न पुरविता मंत्र्यांकडील संबंध चांगले ठेवण्यासाठी कळंगूट येथील बिगरगोमंतकीय कामगारांना मदतीचा हात देण्याचे काम कंपनीने चालविलेले आहे, असा दावा युनियनचे अध्यक्ष आशेंद्र वेळीप यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. अशी मदत करणे ही एक चांगली गोष्ट असली, तरी कंपनीच्या कामगारांकडे पाठ फिरविणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच सरकारने सर्व कामगारांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे ठरविलेले असताना या 219 कामगारांपर्यंत कोणत्याच सुविधा न पोहोचून त्यांच्यावर अन्याय का करण्यात आला हे एक गूढ आहे, असे ते म्हणाले.
खाण संचालनालयामार्फत पगार द्यावा
या आपत्कालीन काळात जिल्हा खनिज निधीचा वापर करणार असल्याचे सरकारने घोषित केले होते. पण आजपर्यंत कोणत्याच कामगाराला त्यातून सुविधा मिळालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाण संचालनालयामार्फत सर्व कामगारांना मासिक पगार व ‘डीए’ देण्यात यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी असून ती निवेदनात नमूद केली आहे. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच स्थानिक आमदार असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनाही पोहोचती केली आहे, अशी माहिती वेळीप यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तू विकत कशा घ्यायच्या ?
आज राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. त्यात गेली पाच वर्षे कुड्डेगाळ येथील फोमेन्तो कंपनीने घरी बसविलेल्या कामगारांच्या भवितव्याबद्दल कोणताच विचार सरकार का करत नाही असा प्रश्न पडतो. कंपनीने कामावरून काढल्यानंतर हे कामगार कुठे तरी रोजंदारीवर कामाला जाऊन आपल्या कुटुंबियांचे पालन-पोषण करत होते. पण सध्या लॉकडाऊन झाल्यामुळे कामावरही जाता येत नाही व खिशात खर्चासाठी पैसेही नाहीत. अशा स्थितीत कामगारांनी कोठून पैसे आणायचे व जीवनावश्यक वस्तू कशा विकत घ्यायच्या ते मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट करावे, असे गोवा खाण कामगार संघटनेचे समिती सदस्य नीलेश वेळीप म्हणाले.
कडधान्ये व भाजी दिली म्हणून सर्व कुटुंबीय व्यवस्थित जगू शकत नाहीत. याव्यतिरिक्त घरातील ज्येष्ठ सदस्यांसाठी, मुलांसाठी औषधे लागतात. अशा अडचणींचे निवारण खिशात पैसे नसताना कसे करायचे याची चिंता सध्या जास्त सतावात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या आपत्कालीन काळात खाण कामगारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी वेळीप यांनी केली.