चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये नितीशना घालवण्यावर एकवाक्मयता आहे म्हणून निवडणुकीत जर कोणा आघाडीला बहुमत मिळाले नाही तर बिहारमधील राजकारणात फार मोठे बदल होणार आहेत.
बिहारची यावेळची निवडणूक अतिशय वेगळी आहे. कोरोना काळातील देशातील ही पहिली निवडणूक असल्याने प्रचारावर मर्यादा येणारच आहेत कारण ही महामारी वाढू नये म्हणून जास्तीत जास्त संपर्क कसा टाळता येईल हे बघितले जाईल. त्याचबरोबर लोकांपर्यंत पोचण्यासाठी नवीन क्लृप्त्या लढवणे राजकीय पक्षांना भाग पडेल कारण जास्तीत जास्त लोकांनी मतदान केल्यानेच आपले तारू किनाऱयाला लागू शकते हे प्रतिस्पर्धी आघाडय़ाना माहिती आहे. राजकीयदृष्टय़ा अतिशय जागरूक राज्य असलेल्या बिहारने कधी कधी देशाच्या राजकारणाला देखील वळण लावले आहे. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीचे आंदोलन बिहारमध्ये सुरू झाले आणि त्याचा परिणाम सरतेशेवटी देशातील पहिले गैरकाँग्रेस सरकार स्थापन होण्यात झाला. ते 1977 साल होते.
रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे जयप्रकाश आंदोलनातून पुढे आलेले बिहारमधील तीन प्रमुख नेते. 1989 साली विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफरसी लागू केल्यापासून उत्तरेतील राजकारणच बदलले. बिहारमधील सामाजिक समतेच्या नव्या युगात हे तीन नेते पुढे आले. येती विधानसभा निवडणूक ही एक प्रकारे तिघांच्या करता शेवटची ठरणार आहे. पासवान यांचे तर गेल्या आठवडय़ात निधन झाले. दलिताला पंतप्रधान बनवण्याचे विश्वनाथ प्रतापसिंग यांचे स्वप्न होते. या पदाकरिता त्यांच्या डोळय़ापुढे पासवान होते जे त्यांच्या मंत्रिमंडळात एक महत्त्वाचे मंत्री होते. पासवान यांनी काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी आपल्या मुलाला राजकीय उत्तराधिकारी बनवले आहे. ‘युवा बिहारी’ म्हणून आपली छाप जनतेवर सोडण्यासाठी चिराग हातपाय मारत आहेत. पण बदललेल्या परिस्थितीत त्यांना कितपत फायदा होणार आणि बापाची पुण्याई त्यांच्या किती कामाला येणार हे पुढील महिन्यात दिसणार आहे. नितीशकुमार यांना येन केन प्रकारेण मुख्यमंत्रीपदापासून ते दूर ठेवण्यात यशस्वी झाले तरी त्यांनी खूप कमावले असे समजले जाईल. ‘हारकर भी जितनेवालोंको बाजीगर कहते हैं’
खरेखोटे कालांतराने पुढे येईलच, पण चिराग यांची लोकजनशक्ती पार्टी भाजप ची ’बी’ टीम समजली जाते. एक फ्लॉप हिरो म्हणून बॉलीवूडला पहिल्या चित्रपटानंतरच टाटा करणारे चिराग बाझीगर ठरणार काय हे येणारा काळच दाखवेल. गमतीची गोष्ट म्हणजे 2011 साली आलेल्या ‘मिले ना मिले हम’ मध्ये चिरागची नायिका सध्या बऱयाच प्रकाशझोतात असलेली कंगना राणावत होती.
गेल्या निवडणुकीत लालूंच्या पक्षाला 243 पैकी 80 जागा मिळून तो नंबर एकवर होता. ती निवडणूक नितीशना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून संयुक्त जनता दलाशी युती करून लालूंनी लढली होती. त्या निवडणुकीत भाजपाला सर्वात जास्त मते मिळाली खरी पण तिचे युतीचे राजकारण बिघडल्याने अवघ्या 53 जागा तिला मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा ‘सुशासन बाबू’ हा ब्रॅण्डच डबघाईला आलेला आहे. एका ताज्या सर्वेक्षणात निम्म्यापेक्षा जास्त लोक हे नितीशकुमार यांच्यावर रागावलेले आहेत आणि बेरोजगारीच्या मुद्यावर त्यांनी अजिबात काम केलेले नाही असे दिसून आलेले आहे.
याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रँड मात्र चमकत आहे. ब्रँड मोदीने नितीश ब्रँडला आधार दिला तरच सत्ताधाऱयांची खुर्ची राहणार आहे. गेल्या सहा महिन्यात नितीश यांच्याविरुद्धचा जनआक्रोश वाढला आहे असे भाजपाच्या जवळची समजली जाणारी प्रसारमाध्यमे मान्य करत आहेत. गमतीची गोष्ट अशी की राज्यात लालूंना अजूनही नेता मानणाऱया बऱयाच यादवांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपला मतदान केले होते. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी बिहारमध्ये लालूंच्या राजदचे सरकार आले तर काश्मीरमधील दहशतवादी राज्यात येतील असा इशारा देऊन ध्रुवीकरणाचा खेळ सुरू केला आहे. 2015 च्या निवडणुकीत तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारमध्ये भाजपा हरली तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असा दावा करून हाच खेळ खेळला होता. कैलासवासी रामविलास पासवान आणि नितीशकुमार यांचे बिहारच्या राजकारणात कधी सूत जमले नव्हते. राज्यातील दलितांमधील लढाऊ समजल्या जाणाऱया पासवान समुदायाचे प्रतिनिधित्व रामविलास करायचे. त्यांची लोकसंख्या सहा टक्के तर नितीश यांचा कुर्मी समुदाय हा जेमतेम तीन टक्के. त्यामुळे आपण नितीश पेक्षा मोठे नेते आहोत असे त्यांना वाटायचे. धूर्त नितीशनी अति पिछडे दलित आणि पासमनदा मुस्लिम (मुस्लिमांमधील मागासवर्गीय समुदाय) यांची एक वेगळी मतपेढी तयार करून एकाच वेळेला रामविलास आणि लालूंना शह दिला. आता चिराग आणि तेजस्वी यांच्यामध्ये नितीशना घालवण्यावर एकवाक्मयता आहे म्हणून निवडणुकीत जर कोणा आघाडीला बहुमत मिळाले नाही तर बिहारमधील राजकारणात फार बदल होणार आहेत. ‘मी मोदीजींचा हनुमान आहे’ अशी घोषणा करून चिरागने नितीशच्या पक्षात हलकल्लोळ माजवला आहे. या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राज्यात रालोआला कोणी हरवू शकत नाही अशी हवा भाजपाने आपल्या शिस्तबद्ध प्रचाराने केली होती. ती हवा आता राहिलेली नाही आणि तेजस्वीच्या सभांना होणारी गर्दी ही एक निराळी कहाणी सांगत आहे. पंतप्रधान प्रचाराला उतरल्यावर निवडणूक कसे वळण घेते यावर निकाल अवलंबून आहे. ‘आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशच’ हे भाजप नेत्यांचे पालुपद कोणाच्या पथ्यावर पडणार ते निकालानंतर कळणार आहे.
सुनील गाताडे