व्यापारी-नागरिकांमधून जोरदार मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमध्ये बँका सुरू ठेवल्या आहेत. परंतु बँका 10 नंतर सुरू होत असल्याने नागरिकांना बँकांमध्ये जाणे काहीसे कठीण होत आहे. बँकेत जाण्यासाठी बाहेर पडणाऱयांना पोलीस पुन्हा माघारी धाडत असल्याने बॅंकांच्या वेळेत बदल करण्याची मागणी व्यापारी तसेच नागरिकांमधून केली जात आहे.
पैसे भरणे व काढण्यासाठी बॅंका सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. एटीएम सुरू असले तरी त्यातून पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. रुग्णांवर उपचार व औषधोपचारासाठी पैशांची गरज भासत असल्याने बँकांमध्ये जाणे गरजेचे आहे. प्रशासनाने लागू केलेल्या मार्गसूचीप्रमाणे 9 नंतर नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. तर बॅंका सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत खुल्या ठेवल्या जात आहेत. त्यामुळे बँकांमध्ये जायचे तरी कसे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
सोमवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10 नंतर बँकांमध्ये जाणाऱयांना रोखले. ज्यांच्याकडे पासबुक आहे त्यांनाही पुढे सोडण्यात न आल्याने पैसे कोठून घ्यायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. असाच प्रश्न व्यापाऱयांसमोरही आहे. सकाळी 6 ते 9 यावेळेत दुकाने सुरू ठेवल्यानंतर बाहेरच्या व्यापाऱयांना डीडी पाठविणे, आरटीजीएस पाठविणे यासाठी बँकांमध्ये जावे लागत आहे. 10 नंतर बँका सुरू होत असल्यामुळे त्यांना तोपर्यंत बँकांसमोर थांबावे लागत आहे. तसेच 10 नंतर येण्याजाण्यास पोलीस मज्जाव करीत असल्याने बँकांच्या कामकाजाची वेळ बदलण्याची मागणी होत आहे.
सकाळी 8 वा. बँका सुरू करा
बँकांच्या वेळेत बदल करुन त्या सकाळी 8 वा. सुरू केल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सध्याची बँकांची वेळ गैरसोयीची असल्याने ती बदलावी, अशी मागणी होत आहे.