प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बँका पतसंस्था फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते किमान 3 महिने थांबविण्यात यावेत, अशी मागणी आज सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या माध्यमातून महिलांनी सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल पासून लॉकडाऊन सुरू असून आता याला जवळपास 45 दिवस पूर्ण होत आहेत. गरिबांच्या हाताला काम नाही, व्यवसाय बंद, काम बंद या परीस्थितीत दोन वेळची भाकरी मुश्किलीने मिळत आहे, अशा वेळी बँका, पतसंस्था, फायनान्स यांचे हप्ते कसे भरणार, फायनान्स मधून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा हप्त्यासाठी महिलांना वसुली पथकाकडून त्रास दिला जात आहे. या पतसंस्था बँक आणि फायनान्सचे हप्ते किमान तीन महिने बंद करावेत आणि वसुली थांबवावी, या आशयाचे निवेदन आज सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या माध्यमातून महिलांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकरी शेखर सिंह यांच्याकडे दिले आहे.