केंद्र सरकारच्या योजनेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
बँक बुडाली तरी ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित राहण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. गेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली होती. या योजनेसाठी ‘ठेव सुरक्षा कायदा’ करण्यात आला आहे.
येथील विज्ञान भवनात पंतप्रधान मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री उपस्थित होते. बुडालेल्या बँकांमध्ये ज्यांचा पैसा अडकला आहे त्यांच्या एकंदर 1,300 कोटी रुपयांची भरपाईही दिली गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात स्पष्ट केले.
बँकेतील ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी विमा योजना देशात 60 वर्षांपूर्वी लागू करण्यात आली होती. प्रथम ती केवळ 50 हजार रुपयांसाठी होती. नंतर तिची व्याप्ती 1 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. तथापि, हे 1 लाख रुपये केव्हा मिळणार याची समयसीमा ठरविण्यात आली नव्हती. तथापि, सध्याच्या केंद्र सरकारने ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढविली असून बँक बुडाल्यास 90 दिवसांच्या आत म्हणजे केवळ तीन महिन्यात ही रक्कम ठेवीदारांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्वांच्या आवाक्यात बँक
बँकेत खाते केवळ श्रीमंत लोकच काढतात अशी समजूत आजपर्यंत होती. तथापि आपल्या सरकारने जनधन योजनेअंतर्गत कोटय़वधी गरिबांची खाती काढून त्यांना बँकेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळे बँका आता सर्वांच्या आवाक्यात आल्या आहेत. तसेच छोटय़ा बँका मोठय़ा बँकांमध्ये विलीन करुन त्यांना सशक्त करण्यात आले. यामुळे रिझर्व्ह बँकही आता बँकांवर योग्य प्रकारे लक्ष ठेवू शकते. आता तंत्रज्ञान विकासामुळे बँकांमधून ठराविक काळातच नव्हे, तर 24 तास व्यवहार होऊ शकतात. दूरवरच्या गावांमध्ये बँकिंग सेवा पोहोचली आहे. जवळपास प्रत्येक गावात आज बँकिंग सुविधा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.