भारतीय किनारपट्टीपासून दूर जाणार, बांगलादेशच्या दिशेने प्रवास
पुणे / प्रतिनिधी
दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून 21 मार्चपर्यंत त्याचे वादळात रुपांतर होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, हे वादळ उत्तर-उत्तरपूर्वेच्या दिशेने प्रवास करत बांगलादेश तसेच उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीजवळ 23 मार्चला सकाळी पोहोचेल. दुसरीकडे कोकण-गोव्यातील उष्णतेची लाट ओसरली असून विदर्भात मात्र गुरुवारपर्यंत ही लाट कायम असेल.
दक्षिण बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. 19 मार्चपर्यंत याची तीव्रता आणखीन वाढणार आहे. 21 मार्चपर्यंत याचे वादळात रुपांतर होईल. सुरुवातीला उत्तर उत्तर-पश्चिमेच्या दिशेने प्रवास करत त्यानंतर उत्तर उत्तर-पूर्वेकडे वळून ते 23 मार्चला सकाळी बांगलादेश व म्यानमारच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल. याच्या प्रभावामुळे 18 मार्चपासून अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस होणार असून 20 तारखेनतंतर यात आणखी वाढ होईल. या भागात जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
उष्णतेची लाट कायम
वायव्य, मध्य भारत तसेच उत्तरेत उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या 24 तासांत राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कोकण-गोवा विदर्भ, तेलगंणा, ओडिशा तसेच जम्मू -काश्मीरच्या भागात उन्हाचा चटका होता. यात कोकण-गोवा वगळता इतर भागात गुरुवारीदेखील ही लाट कायम राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भात ही लाट कायम असेल. यानंतर त्याची तीव्रता ओसरेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.