मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यापासून मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या १२ तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी येत्या १२ तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २४ तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे.