शिशिर अन् दिव्येंदु अधिकारींकरता गृह मंत्रालयाचा निर्णय
वृत्तसंस्था / कोलकाता
केंद्रीय गृह मंत्रायलाने पश्चिम बंगालमधील लोकसभा खासदार शिशिर कुमार अधिकारी आणि दिव्येंदु अधिकारी यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. या प्रकरणी सीआरपीएफला आदेश देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हिंसा होत आहे. भाजपचे अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. भाजप नेत्यांना धमक्या मिळत असल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत भाजपच्या दोन खासदारांवरून चिंता वाढली होती. याचमुळे केंद्र सरकारने त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिशिर कुमार अधिकारी हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते सध्या कांथी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तर दिव्येंदु अधिकारी बंगालच्या तमलुक मतदारसंघाचे खासदार आहेत. दिव्येंदु हे भाजपचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे बंधू आहेत. तर शिशिर हे त्यांचे वडिल आहेत.
राज्यात हिंसाचार
बंगालमध्ये निवडणुकीनंतरची हिंसा राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून परस्परांना धडा शिकविण्याच्या प्रवृत्तीच्या स्वरुपात समोर येत आहे. राजकीय हिंसाचारासाठी दोन्ही पक्ष परस्परांवर आरोप करत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी स्वतःच्या समर्थकांना राजकीय हिंसा रोखण्याचे आवाहन केले, पण याचा दोष भाजपला दिला आहे. राज्यात राजकीय हिंसाचा दीर्घ इतिहास राहिला आहे.