खडगपूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा -10 वर्षांत ममतांनी बंगालला उद्ध्वस्त केले
वृत्तसंस्था / खडगपूर
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान (27 मार्च) आता जवळ येऊन ठेपले आहे. अशा स्थितीत तेथील राजकीय रणधुमाळीला जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची शनिवारी खडगपूरमध्ये प्रचारसभा झाली आहे. या सभेत मोदींनी बंगालमधील विकास आणि भ्रष्टाचारावरून तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. मोदींनी सोशल मीडिया डाउन झाल्याने लोकांच्या अस्वस्थततेचे उदाहरण देत बंगालमध्ये 50 वर्षांपासून विकास आणि स्वप्ने डाउनच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी 10 वर्षांच्या कार्यकाळात बंगालला उद्ध्वस्त केले आहे. दिलीप घोष यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष असल्याचा मला गर्व आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षाला विजयी करण्यासाठी ते झटत आहेत. ममतांच्या धमक्यांना ते घाबरले नाहीत. बंगालच्या उज्ज्वल भविष्याचा निश्चय त्यांनी केला असल्याचे मोदी म्हणाले.
शुक्रवारी 50-55 मिनिटांसाठी व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामही डाउन झाले. सर्वजण अस्वस्थ झाले, पण जगात 50-55 मिनिटांसाठीच सोशल मीडियाची गोष्ट डाउन झाली, पण बंगालमध्ये 50 वर्षांपासून विकासच डाउन झाला आहे. स्वप्ने डाउन झाली आहेत. संकल्पही डाउन झाल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख
पंतप्रधानांनी संस्कारांचा मुद्दा उपस्थित करत श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख केला आहे. भाजप जनसंघातून निर्माण झालेला पक्ष आहे. जनसंघाचे जनक याच बंगालचे सुपुत्र श्यामाप्रसाद मुखर्जी होते. अशा स्थितीत येथे खरा बंगालचा पक्ष कुणी असेल तर तो भाजप आहे. भाजपच्या डीएनएत आशुतोष मुखर्जी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे आचार-विचार आणि संस्कार आहेत. आम्ही बंगालमध्ये केवळ कमळ फुलवू इच्छित नाही तर येथील लोकांचे भविष्य उज्ज्वल करू इच्छितो असे मोदींनी म्हटले आहे.
टोलाबाजी, कटमनी अन् भ्रष्टाचार
ममतादीदींची क्रूरतेची पाठशाळा आहे. या पाठशाळेचा अभ्यासक्रम टोलाबाजी, कटमनी, भ्रष्टाचार आहे. येथे शिक्षणाची स्थिती काय आहे हे खडगपूरचे लोक चांगल्याप्रकारे जाणतात. ममतादीदी खेला होवे (खेळ होणार) म्हणत आहेत. तर बंगाल विकास आरंभ होवे म्हणत आहे. ममतादीदींकडून बंगालची जनता 10 वर्षांचा हिशेब मागत आहे, पण उत्तर देण्यासाठी ममतादीदी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
केवळ माफिया उद्योग चालविले
एकीकडे देश सातत्याने सिंगल विंडो सिस्टीमच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर बंगालमध्ये पाइपो सिंगल विंडो सिस्टीम आहे. या विंडोला सामोरे गेल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. मागील वर्षात तृणमूल सरकारने रोजगार संपविणारी कामे केली आहेत. तृणमूलच्या सिंडिकेटमुळे अनेक उद्योग बंद झाले आहेत. येथे एकच उद्योग चालवू दिला गेला असून तो माफिया उद्योग आहे. बंगालमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यावर या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले.
लोकशाही चिरडू देणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताधिकाराची अनमोल शक्ती दिली आहे. पण बंगालमध्ये ममतादीदी बंगालमध्ये जनतेचा मताधिकार हिरावत राहिल्या आहेत. ममतांनी पंचायत निवडणुकीत ज्याप्रकारे लोकांचा हा अधिकार चिरडल्याचे जगाने पाहिले आहे. पण ममतादीदींना लोकशाही चिरडू देणार नसल्याचे बंगालच्या लोकांना सांगू इच्छितो असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.