कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीवरून तृणमूल काँग्रेसने स्वतःच्या अधिकृत प्रचारमोहिमेचा शुभारंभ केला आहे. प्रचारमोहिमेत ‘बंगाली विरुद्ध बाहेरचा’ या मुद्दय़ावर भर देण्यात आला आहे. तृणमूलने प्रचारात बंगाली कार्ड वापरले आहे. राज्याची सलग तिसऱयांदा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील तृणमूलने बंगाली अभिमान आणि संस्कृतीच्या रक्षणाचे आश्वासन जनतेला दिले आहे. बंगालला वाईट शक्तींपासून वाचण्यासाठी लोक स्वतःच्या ‘मुली’सोबत आहेत, असे उद्गार तृणमूल खासदार काकोली घोष यांनी काढले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पक्षाकडे ममता बॅनर्जी आहेत, बंगालचे सर्व लोक ममतांवर मनापासून प्रेम करतात. तर अन्य पक्ष अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयाच्या शोधात असल्याचे तृणमूल नेते सुब्रत मुखर्जी यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाकडून नाराही प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘बांग्ला निजे मेये के चाय’ असा हा नारा असून याचा अर्थ ‘बंगाल आपल्या मुलीवर प्रेम करतो’ असा होतो. तृणमूलचा संदेश जोरदार आणि स्पष्ट आहे. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिमपर्यंत बंगालमध्ये केवळ ममता बॅनर्जी हेच नाव दिसून येते. ममता बॅनर्जी स्वतःच्या लोकांसाठी पूर्ण शक्तिनिशी लढतात, असा दावा त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये यंदा होणाऱया निवडणुकीत भाजप अन् तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून जगतप्रकाश नड्डा, अमित शाह आणि पंतप्रधान मोदींच्या सभा होत आहेत.