पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत सुरू असताना काँग्रेसच्या वेगळीच भीती सतावू लागली आहे. आसामनंतर पक्षाने पश्चिम बंगालमध्येही विजयाची शक्यता असलेल्या मतदारसंघांची ओळख पटविण्यास सुरुवात केली आहे. मतदान संपुष्टात आल्यावर उमेदवारांना राजस्थान आणि छत्तीसगड येथे पाठविण्याची योजना आहे. निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्यास सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य पक्षांच्या आमदारांना भाजप फोडू शकतो अशी भीती काँग्रेसला आहे.
आमदारांपर्यंत पोहोचण्याची कुठलीच संधी काँग्रेस पक्ष भाजपला देऊ इच्छित नाही. याचमुळे विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारांना छत्तीसगड येथे पाठविण्याची तयारी केली जात आहे. भाजप अनेक राज्यांमध्ये अन्य पक्षांमध्ये फूट पाडून सत्तेवर पोहोचला आहे. अशा स्थितीत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. या उमेदवारांना मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी परत आणले जाणार आहे. मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत हॉटेलात पाठविण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या एका मोठय़ा नेत्याने म्हटले आहे.
काँग्रेसला केरळमध्ये कुठल्याही प्रकारच्या फुटीची भीती नाही. केरळमध्ये भाजपचे फारसे बळ नाही. अशा स्थितीत केरळमध्ये आमदार फुटण्याची कुठलीच भीती नाही. खरी भीती आसाम आणि पश्चिम बंगालमध्येच आहे. कारण सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप बहुमत जमविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नेत्याने सांगितले आहे.
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केरळ आणि आसाममध्ये सत्तेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर तामिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करता येणार असल्याचा पक्षाला विश्वास आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संख्याबळ समान झाल्यास काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.