प्रतिनिधी/आजरा
नागरीकत्व सुधारणा कायदा रद्दच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आजरा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच व्यापाऱयांनी कडकडी बंद पाळल्यामुळे दिवसभर आजरा शहरात शुकशुकाट होता.
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या निमित्ताने सकाळी बंदचे आवाहन करीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मुख्य बाजारपेठेतून आजरा तहसीलदार कार्यालय परिसरात आल्यानंतर सभा घेण्यात आली. यावेळी मोर्चाच्यावतीने शांताराम पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, अजय देशमुख, राहुल बोरे, समीर खेडेकर, संग्राम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. नागरीकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा नेमका काय आहे याची माहिती देऊन हा जाचक कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात बहुजन क्रांती मोर्चा आजरा तालुका संयोजन समितीचे शरद कुंभार, आजरा पंचायत समितीचे सदस्य बशीर खेडेकर, नगरसेविका सुमैय्या खेडेकर, यास्मिन बुड्डेखान, रेश्मा सोनेखान, समीर चाँद, रशिद पठाण, दिलावर चाँद, जुबेर माणगावकर, अबु माणगावकर, जी. व्ही. राजदीप, किरण कांबळे यांच्यासह बहुजन समाजातील नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सभेची सांगता करण्यात आली.
बंदच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरातील व्यापारी, उद्योजक, दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे आजरा शहरात दिवसभर शुकशुकाट होता. बंद दरम्यान गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांनी भेट दिली. तर बंद काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजऱयाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.