प्रतिनिधी/पन्हाळा
सध्या कोरोना संसर्गामुळे देशभरात पर्यटनाला बंदी असतानाही पन्हाळयावर पर्यटकांची घुसखोरी सुरू आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने पर्यटकांची गडावर रेलचेल सुरु होती. मात्र सायंकाळी पाच नंतर जास्त भर पडली.
लॉकडाऊनमुळे गेली दोन-अडीच महिने पन्हाळा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र सरकारने लॉकडाऊनमध्ये थिथिलता दिल्याने जिल्ह्यात कुठेही फिरता येत असल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा पन्हाळ्याकडे वळविला आहे. सायंकाळी पाच नंतर यामध्ये जास्तच भर पडली. त्यामुळे जकात नाका येथे स्थानिक नागरिकांनी दक्षतेसाठी पर्यटकांची वाहने सोडु नये म्हणुन आक्रमक पवित्रा घेत वाहने अडवुन धरली. तथापि यामुळे वाहनांची मोठी गर्दी याठिकाणी झाली होती. काही पर्यटकांनी वाहने नाका परिसरातच लावुन पायी चोरट्या मार्गाने पन्हाळ्यात शिरकाव केलाच त्यामुळे पन्हाळ्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यानंतर जकात नाका येथे स्वत: तहसिलदार रमेश शेंडगे, मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, माजी नगराध्यक्ष जहाँगीर जमादार यांनी कठोर भुमिका घेत पर्यटकाच्यावर कारवाई करत गडावरुन माघारी पाठविले. तर नगरपरिषदेने यावेळी मास्क न वापरणाऱ्यावर दंडाची कारवाई केली. यावेळी सुमारे 25 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई केली. दरम्यान,पन्हाळगड हे पर्यटनासाठी बंद असुन शासना निर्णयानुसारच पुढील दिशा ठरविली जाईल. तोपर्यंत पर्यटनासाठी पन्हाळा बंद असुन पर्यटकांनी यांची दखल घ्यावी असे आवाहान तहसिलदार रमेश शेंडगे, मुख्याध्यकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी केले आहे.