मल्हारपेठेतील घटना, दोन सराईत गुंडांना अटक
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील दोन बहिणी गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर रस्त्याने चालत फिरत होत्या. यावेळी एका चार चाकी गाडीत चार अज्ञात इसम बसून आले. व त्यांनी गाडी युवतींच्या दिशेने नेली. यावेळी युवतींनी आरडाओरडा केल्याने या इसमांनी कोयत्याचा व बंदुकीचा धाक दाखवला. यामुळे घाबरलेल्या युवतींनी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन सराईत गुंडांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मल्हारपेठ येथे राहत असलेली फिर्यादी सुनिता अरुण तपासे (वय 28) व त्यांची बहीण अश्विनी या दोघी रात्रीचे जेवण झाल्यानंतर रस्त्याने फिरत होत्या. यावेळी एक पांढऱया रंगाची कारमधून चार अनोळखी इसम या मार्गाने निघाले होते. यावेळी गाडी अचानक सुनिता व अश्विनी यांच्याकडे आली. गाडी स्वतःकडे येत असल्याने त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे एका इसमाने गाडीत असणारा कोयता काढला आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तर एकाने बंदुकीचा धाक दाखवला. घडलेल्या या प्रकारामुळे दोघी बहिणी चांगल्याच घाबरल्या होत्या.
या चौघा अनोळखी इसमांविरूद्ध युवतींनी 13 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर तपासाची चक्रे गतीमान फिरली आणि शनिवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणातील दोन संशयित अनिल कस्तुरे (वय 38 रा. करंजे), शुभम कांबळे (वय 28 रा. बुधवारनाका गेंडामाळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सराईत गुंड असून त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.
पथदर्शी प्रकल्प राबवूनही महिला असुरक्षित…
सातारा जिह्यात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी महिला-तरुणींच्या सुरक्षितेसाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु पथदर्शी प्रकल्प राबवूनही महिला, तरूणी यांच्यावरील अत्याचार, छेडछाडीच्या घटना कमी झालेल्या नाही. युवतींना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारी ही घटना नुकतीच सातारा शहरात घडली आहे. यामुळे सातारा शहराचे बिहार होवू पहातेय का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षितेवर पथदर्शी प्रकल्प सुरू असूनही प्रश्नचिन्ह उभे आहे.