रायबाग येथील मेंढपाळाची व्यथा : बकरी दगावल्याने मोठे नुकसान, प्रशासनाचे डोळे उघडणार का?
दीपक ल. बुवा /बेळगाव
देवा…. हवे तर मला घेऊन जा…. पण पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ केलेल्या माझ्या बकऱयांना नेऊ नकोस…. माझ्यासाठी त्यांचा जीव स्वतःच्या जीवापेक्षा प्यारा आहे… एक तर त्यांना जगव नाही तर मला तरी घेऊन जा… ही आर्त हाक आहे भीमा पुजेरी या मेंढपाळाची…. सातत्याने कळपामधील बकरी अचानक दगावत असल्याने भीमा हतबल झाला असून बकऱयांसाठी तो देवाकडे प्रार्थना करतो आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विंचवांचे बिऱहाड पाठीवर… या म्हणीप्रमाणे धनगर समाज आपल्या बकऱयांच्या कळपासह रानोमाळ फिरत असतो. धनगरासाठी आपल्या जीवाभावाची अशी आपली बकरीच असतात. त्यामुळेच आपल्या बकऱयांवर जीव ओवाळून टाकणाऱया धनगरांसमोरच जेव्हा बकरी दगावतात तेव्हा मात्र त्याची तगमग न बघवणारी असते. 50 बकऱयांचा कळप असणाऱया भीमाकडे आता केवळ 15 बकरी शिल्लक राहिली आहेत.
परंपरेने धनगरांमध्ये मेंढय़ा पाळण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे डोंगर असो किंवा काटेरी झुडूपे. आपली बकरी चारण्यासाठी रानावनात घेऊन जातात व तेथेच आपला मुक्काम करतात. आपली बकरी जगविण्यासाठी मेकळी (ता. रायबाग) येथील एक धनगर मागील काही महिन्यांपासून नंदिहळ्ळी परिसरात येऊन राहत आहे. मात्र त्याच्या कळपातील अनेक बकरी दगावली आहेत. औषधोपचार झाले. परंतु त्याच्या कळपातील बकरी काही जगत नसल्याने त्याने नियतीसमोर हात टेकले आहेत. पोटापाण्यासाठी कोसो दूर येऊन जर आपल्या जीवाभावाचे साथीदार दगावत असतील तर जगून तरी काय करू? असा प्रश्न तो विचारत आहे.
भीमा दिवाळीला नंदिहळ्ळी परिसरात बकरी घेऊन येतो. मृगाच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर तो तेथून पुन्हा आपल्या बकऱयांचा कळप घेऊन रायबागला परत फिरतो. त्याच्या कळपात साधारणतः 50 बकरी होती. मात्र काही महिन्यांपासून त्याची बकरी दगावत आहेत. एक तर आपले गाव सोडून तो दुसऱया गावी वास्तव्यास आहे. अशातच त्याने आपली बकरी वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. अनेक ठिकाणी जाऊन बकऱयांवर उपचार केले. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने तो खचून गेला आहे.
आता असलेल्या बकऱयांवर योग्य ते उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. परिणामी त्याने आपली सर्व ताकद लावली आहे. विशेष करून याबाबत अनेक लोकप्रतिनिधी व पशुवैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधला. मात्र त्याला कोणाचेच सहकार्य लाभले नाही. त्यामुळे त्याचे जगणेही कठीण बनले आहे. बकऱयांऐवजी देवाने मलाच का मरण दिले नाही? असे तो विचारत आहे.
पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. कळपातील काही बकरी दगावण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्याने दाद तरी कोणाकडे मागायची? हा प्रश्न आहे. एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी अवस्था त्याची झाली आहे. त्यामुळे बेळगावकरांनी माणुसकी दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या उरलेल्या बकऱयांसह तो उदरनिर्वाह करत असला तरी त्याला मोठा आर्थिक फटका बसला असून मदतीची गरज आहे.
माझी लेकरं गेली हो! – भीमा पुजेरी
मोठय़ा आशेने आपण ही बकरी बाळगली आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून माझ्या लेकरांना काय त्रास होत आहे हे समजणेच कठीण बनले आहे. परिणामी माझ्या लेकरांचा जीव माझ्या डोळय़ासमोर जाताना पाहून माजी घालमेल वाढते आहे. त्यामुळे देवाने मलाच मरण दिले तर बरे होईल. बकरी दगावल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून मदत मिळणे गरजेचे
भीमा हा आपल्या भागात मागील अनेक वर्षांपासून ये-जा करतो. त्यामुळे आपल्या गावच्या परिसरात तो बकरी चारतो. मात्र मागील काही महिन्यांपासून त्याची बकरी दगावत आहेत. त्यामुळे आता तो हतबल झाला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनातर्फे त्याला मदत मिळणे गरजेचे आहे. त्याचे मोठे नुकसान झाले असून त्याला सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी.
– नेमाणी चौगुले