काँग्रेसच्या कुबडय़ांवर राजकारण करणारांनी आमच्या बहुमताची मापे काढू नयेत; राजेंद्रसिंह यादव
प्रतिनिधी /कराड
जनशक्ती आघाडीने उपसूचनेद्वारे मांडलेले 270 कोटींचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंजूर केले. हा आमचा नैतिक विजय आहे. स्मार्ट सिटीचे बनवण्याचे स्वप्न आम्ही पाहिले असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काँग्रेसच्या कुबडय़ांवर राजकारण करणाऱया भाजपच्या विनायक पावसकर यांनी आमच्या बहुमताची मापे काढू नयेत, असा टोला जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
कोरोना महामारीमुळे लोक अडचणीत असल्याने कोणतीही करवाढ न करता बजेट स्थायी समितीत मंजूर केले होते. मात्र त्यात करवाढ सुचवल्याने आम्ही ते विशेष सभेत नाकारून 270 कोटींची उपसूचना मांडली. मुळात भाजपच्या सदस्यांनी 134 कोटींचे बजेट मांडले. त्यास अनुमोदनही देण्यात आले होते. मग त्यात वाढ कशी झाली? चांगले झाले की आम्ही केले, वाईट झाले की प्रशासनाने केले, असा पवित्रा नगराध्यक्षा आणि भाजपने सतत घेतला आहे. मुळात बजेटवर नगराध्यक्षांची सही असून त्याच बजेटला जबाबदार आहेत. मागे हुतात्मा स्मारक हस्तांतरित करण्याचा विषयही सभेपुढे आला होता. मुळात सभा काढण्याचा अधिकार नगराध्यक्षांचा आहे. पालिकेत बुद्धिभेद, लबाडी, फसवणूक असे प्रकार सुरू आहेत. आता तर कागदपत्रेही गहाळ होऊ लागली आहेत, असा आरोप यादव यांनी केला.
आम्ही 134 कोटींच्या बजेटला विरोध करत स्मार्ट सिटीचा संकल्प करत 270 कोटींचे बजेट मांडले. त्यामुळे शहराचे काही नुकसान झाले का?, असा प्रश्न करून शहराला वाढीव निधी मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न पाहिले असून ते पूर्ण करण्याची धमकही आमच्यात आहे. आमच्या बजेटला विरोध करून शहर विकासात ते आडवे आले आहेत. त्यांचा विलंब आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. विविध कामांचे अनुदान, निधी पालिकेकडे जमा झाला आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
जनशक्तीच्या बहुमताची काळजी पावसकरांनी करू नये. भाजपमध्ये काय चाललंय, ते पाहावे. नगराध्यक्षांना पहिल्या सहा महिन्यातच स्थायीत अश्रू का आले, फिरस्ती कोण म्हणाले, उचापती कॉन्ट्रक्टर कोण म्हणाले, हे पाहावे. जनशक्तीच्या बहुमताते आम्ही पाहू. आमचा विरोध भाजपला नसून त्यातील पावसकर गटाला आहे. केवळ स्थायीत सदस्यत्व मिळण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या दोन सदस्यांचा पाठिंबा घेतला आहे. भाजपमध्ये अनेक निष्ठावंत असताना पटवेकरांना स्वीकृत का केले, त्यावेळी निष्ठावंतांना का विचारले नाही, असे प्रश्न यादव यांनी विचारले.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची बदली झाल्यानंतर पालिकेत काहींनी काजू कथली वाटून आनंद व्यक्त करत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे स्वागत करण्यात आले. तेच रमाकांत डाके त्यांना आता वाईट कसे झाले. काजू कथलीचे कारले कसे झाले? डांगे, डाके हे चुकीचे आणि एकच माणूस सतत बरोबर कसा असू शकतो, असा युक्तिवादही यादव यांनी केला.
नगराध्यक्षांचे खोटारडेपण सिद्ध
पालिकेच्या जनरल फंडातील पैसे ठराव बदलून घेणाऱया नगराध्यक्षांचे खोटारडेपण सिद्ध झाल्याची टीका महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी केली. त्यांना बजेट कळत नाही, पण टक्केवारी कळते, असा टोला त्यांनी लगावला.
मला स्वच्छतेची काळजी, बिलांचा फॉलोअप घेणारच
स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मी भरपूर काम केले असून यात मला मोठा आनंद मिळतो. स्वच्छतेशी निगडीत कामांच्या बिलांना विलंब झाला तर त्याचा फॉलोअप मी घेणारच, असे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी पावसकरांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.