वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी केली असली तरी इंग्लंडने अनुभव पणाला लावत येथील तिसरी
टी-20 तब्बल 8 गडी राखून जिंकली आणि मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. प्रारंभी, इंग्लंडने भारताला 20 षटकात 6 बाद 156 धावांवर रोखले आणि त्यानंतर 18.2 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने अवघ्या 52 चेंडूत 83 धावा झोडपल्या आणि यामुळे इंग्लंडसाठी विजयाचे दरवाजे जणू सताड उघडले. पॉवरप्लेमध्ये बटलरने शार्दुल ठाकुर व यजुवेंद्र चहल यांच्या सलग षटकांमध्ये तोडफोड फटकेबाजी केली आणि तिथून पुढे सामन्यावर इंग्लंडचे एकतर्फी वर्चस्व राहिले.
बटलरने जलद-मध्यमगती गोलंदाजांप्रमाणेच फिरकीपटूंचाही त्याच तडफेने उत्तम समाचार घेतला आणि यावर विराटसेनेकडे काहीच ठोस प्रत्युत्तर नव्हते.
भारतातर्फे विराट कोहली तर प्रत्युत्तरात इंग्लंडतर्फे बटलरचे अर्धशतक लक्षवेधी होते. मात्र, मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर त्यांच्या जलद गोलंदाजांनी केलेला नियंत्रित, भेदक मारा भारताच्या दृष्टीने अधिक हानिकारक ठरला. मार्क वूडच्या प्रतितास 90 मैल वेगाने येणारे चेंडू खेळताना भारतीय युवा फलंदाजांची फरफट झाली आणि इथेच भारताच्या पराभवाची जणू दास्ताँ लिहिली गेली.
विराटचेही अर्धशतक, पण…
प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारतातर्फे चौफेर फटकेबाजी करणाऱया विराटने येथे 46 चेंडूत 77 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार व 4 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचा हा 100 वा टी-20 सामना होता.
मंगळवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लिश कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्याच्या गोलंदाजांनी प्रारंभी हा निर्णय सार्थ ठरवल होता.
तिन्ही आघाडीवीर अपयशी
केएल राहुल (0), इशान किशन (4), रोहित शर्मा (15) या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यानंतर भारताची एकवेळ 5.2 षटकातच 3 बाद 24 अशी दाणादाण उडाली होती. मात्र, नंतर विराटने झंझावाती फलंदाजी साकारल्यानंतर भारताला 150 धावांचा टप्पा सर करता आला. त्याला रिषभ पंत (20 चेंडूत 3 चौकारांसह 25), हार्दिक पंडय़ा (15 चेंडूत 17) यांची काही प्रमाणात साथ लाभली.
केएल राहुलचा खराब फॉर्म कायम राहिल्यानंतर भारताला याचा पुन्हा एकदा फटका बसला. या मालिकेत प्रथमच खेळत असलेल्या रोहितला देखील येथे फारसा सूर सापडलाच नाही. त्याने वूडच्या गोलंदाजीवर आर्चरकडे सोपा झेल दिला. दुसरा सामना गाजवणाऱया इशान किशनला देखील स्वस्तात बाद होत परतावे लागले. या पडझडीमुळे एकवेळ 3 बाद 24 अशी स्थिती झालेल्या भारतीय संघासाठी पुढे विराट-रिषभ पंत यांची चौथ्या गडय़ासाठी 40 धावांची भागीदारी देखील महत्त्वाची भासू लागली.
रिषभ पंत धावचीत
विराटच्या कॉलवर रिषभला धावचीत होत परतावे लागले. त्यानंतर श्रेयस अय्यरला (9 चेंडूत 9) देखील अजिबात सूर सापडला नाही. त्याने वूडच्या गोलंदाजीवर मलानकडे सोपा झेल दिला. सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना विराटच्या फटकेबाजीत खंड पडला नव्हता. पुढे, पंडय़ा आल्यानंतर त्याने प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा प्रयत्न केला. विराटने चौकार फटकावत थाटात अर्धशतक साजरे केले व नंतरही सपाटा कायम राखला होता.