कित्येक दशके पुणेकरांची दाद मिळवण्याचा विक्रम करणाऱया ‘प्रभा विश्रांती गृह’चे मालक उदय परांजपे यांचे नुकतेच निधन झाले. बटाटे वडा हा मराठी खवय्यांचा मानदंड. खरे तर खानदंड. आहे. पारंपरिक शेव, चकली, चिवडा त्याला टक्कर देऊ शकला नाही. एरव्ही मराठी माणसावर आक्रमण करण्यात परप्रांतीय लोक पटाईत असले तरी बटाटे वडय़ासमोर ढोकळा, सामोसा, पाणी पुरी, मेदू वडा चारी मुंडय़ा चीत. भजी हे तसं बटाटे वडय़ाचंच अपत्य. वडा अमिताभ असेल तर भजी अभिषेक. पुण्यात जोशी वडेवाले आणि प्रभा हे दोनच खरे ब्रँडेड बटाटे वडे. महानगरात एक मोठा डॉन असला तरी उपनगरात त्याच्या तोडीचे स्थानिक डॉन असतातच. तसे पुण्यात इतरही नामांकित बटाटे वडे आहेत. लक्ष्मी रस्त्यावर लेले यांचा जुना आले-लसून घातलेला झणझणीत वडा, नव्याने उगवलेला शनिवार पेठेतला अन्नपूर्णाचा टपोरा वडा किंवा पश्चिम पुण्यातला फक्कड नावाचा गब्बरसिंगसारखा गलेलठ्ठ आणि सात्त्विक वडा… पण जोशी वडेवाले आणि प्रभाचा वडा हे अग्रगण्य. त्यात जोशी म्हणजे मॅजेस्टिकच्या लोकप्रिय पुस्तकांसारखा लोकप्रिय. तर प्रभा म्हणजे मौजेच्या काव्यसंग्रहासारखी मर्यादित आवृत्ती. दोन्ही आपापल्या जागी ग्रेट.
प्रभाच्या वडय़ाची चव वेगळीच. उकडून मऊ कुस्करलेल्या बटाटय़ात तिखट-मीठ, लिंबू, साखरेसह काहीतरी गुप्त पदार्थ मिसळून बेसनाच्या पारीत बुडवून तळलेला तो दणदणीत वडा पाहूनच तृप्त व्हायला होई. मात्र मौजेच्या पुस्तकांची मर्यादित आवृत्ती असावी तसे मोजून वडे बनवले जात. जरासा उशीर झाला की वडे संपले. यावरून त्यांची टिंगल झाली. पुण्यात टिंगल कोणाची होत नाही? बाकरवडीवाले चितळे देखील सुटले नाहीत. पण पुण्यात टिंगल आणि प्रेम यांचे प्रमाण व्यस्त नसते. प्रेम असेल तरच टिंगल होते. जितके प्रेम जास्त तितकी टिंगल जास्त.
परांजपे यांचे अनेक किस्से आहेत. ते सर्वज्ञात आहेत. पण मोजून वडे करण्याच्या त्यांच्या धोरणाची इतरांनी थट्टा केली तरी मला मात्र सदैव कौतुक वाटले. रशियन लेखक तल्स्तोय (टॉलस्टॉय)ची शाळेत शिकलेली. माणसाला किती जागा लागते ही कथा त्यांना खरोखर समजली होती. किती धावायचे आणि कुठे थांबायचे हे त्यांनी ओळखले, ठरवले आणि त्याप्रमाणे मस्तीत जगले. त्यांना पुणेकरांतर्फे श्रद्धांजली.