मुंबई \ ऑनलाईन टीम
देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. देशात कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडथळा येत आहे. केंद्र सरकारने लसी घेऊन राज्यांना द्यावी अशी मागणी होत होती. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी दाखवली असल्याची टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आज देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्या…, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
या ट्वीटमध्ये अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यात आली आहे. कारण महाराष्ट्र आणि दिल्लीचे मुख्यमंत्री लसींच्या तुटवड्यावरुन, लसींच्या धोरणावरून केंद्र सरकारडे लसींची मागणी करत होते. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.