प्रतिनिधी / बेळगाव
श्री नागेंद्र स्वामी बडेकोळमठाला जाणारा तीन किलो मीटरचा रस्ता करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे अनेकवेळा करण्यात आली. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे पुन्हा बुधवारी भक्तांनी आणि वकिलांनी जिल्हाधिकाऱयांना तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गापासून बडेकोळमठाला जाणारा 3 कि. मी. चा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तो रस्ता करणे महत्त्वाचे आहे. कारण बडेकोळमठाला केवळ कर्नाटकच नाही तर महाराष्ट्र आणि गोवा येथूनही भक्त येत असतात. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा राष्ट्रीय महामार्गावरच रास्ता रोको करू, असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. आर. एल. नलवडे, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. एम. एस. नंदी, ऍड. एम. बी. बोगार, ऍड. एस. सी. मोदगेकर, ऍड. एम. के. कांबळे, ऍड. शिवपुत्र फटकळ, ओंकार पाटील, एस. एन. पडेण्णावर यांच्यासह इतर वकील व भाविक उपस्थित होते.