दामले यांच्या क्लुप्तीपुढे थकबाकीदार टेकणार गुडघे
प्रतिनिधी/सातारा
शहरात अनेकजण पालिकेचा कर भरत नाहीत.सर्वसामान्य नागरीक पालिकेची घरपट्टी, पाणी पट्टी नित्यनेमाने भरत असतात.मात्र, या कर बुडव्या बडय़ा थकबाकीदाराकडून थकलेला कर वसूल करण्यासाठी नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्य वसुली अधिकारी अरविंद दामले यांनी वसूलीचा ऍक्शन प्लॅन आखला आहे.त्यांच्या क्लुप्तीपुढे थकबाकीदार गुडघे टेकणार आहेत.फक्त मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशाची प्रतीक्षा उरली आहे.
सातारा शहरात अनेक थकबाकीदार आहेत ते काही केल्या कर भरत नाहीत. परंतु सर्वसामान्य नागरिक पाणी पट्टी,घर पट्टी वेळेवर भरत असतो.पालिकेच्यावतीने मार्च एन्डच्या पूर्वी वसुली मोहीम राबविण्यात येते.सध्या पालिकेत काही दिवसांपूर्वी खांदे पालट करण्यात आली आहे.दामले यांच्याकडे वसूली विभागाचा पदभार दिला आहे.त्यांनी पदभार स्वीकारताच यापूर्वी वसूली विभागात काम केल्याने त्यांनी त्यांच्या टॅक्टनुसार वसुली कशी करायची याचा आराखडा केला आहे.एक ऍक्शन प्लॅन तयार केला असून 5 लाखाच्या पुढचे थकबाकीदार आहेत त्यांच्या घरावर जप्ती मोहीम राबवण्यात येणार आहे.किमती वस्तू पंचनामा करून ताब्यात घेणार आणि त्या वस्तूचा लिलाव करण्यात येणार आहे.अशा वेगवेगळ्या टॅक्ट दामले हे राबविणार आहेत.त्यामुळे दिवाळीनंतर पालिकेची वसुली मोहीम तीव्र होणार आहे.