काजूचा मोहोर करपल्याने उत्पादक संकटात : उत्पादनात घट होण्याची भीती
प्रतिनिधी / बेळगाव
बदलत्या हवामानाचा काजू फळधारणेवर मोठा परिणाम होत असून उत्पादनातही घट होण्याची भीती काजू उत्पादक शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. गतवषी देखील बदलत्या हवामानाचा फटका बसून उत्पादनात घट झाली होती. कधी उष्मा, कधी थंडी, कधी धुके तर कधी पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे काजू पिकावर विपरीत परिणाम होत असून बहरलेला काजूचा मोहोर करपून जात आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, उचगाव, कुद्रेमनी, कल्लेहोळ, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते आदी भागात काजूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मात्र काजूचा मोहोर करपून जात असल्याने काजूला फळधारणा देखील किरकोळ प्रमाणात होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी काजूच्या फळधारणेवर कीडीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळे काजू उत्पादनात घट होईल, असे भाकित शेतकऱयांतून वर्तविण्यात येत आहे.
लाल जमीन व डोंगराळ भागात काजूचे अधिक उत्पादन घेतले जाते. तालुक्यातील पश्चिम भागात अलीकडेच काजूच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वेंगुर्ला व देवगड भागातून काजूची रोपे आणून लागवड केली जात आहे. अलीकडच्या काही वर्षात काजूला चांगला भाव मिळत असल्याने काजू बाग तयार करण्याकडे कल वाढला आहे. लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. मात्र यावर्षी बदलत्या हवामानामुळे काजू उत्पादनावर परिणाम होत आहे. काजूच्या झाडांवर कीडीचा प्रादुर्भाव होत असल्याने आलेला मोहोर करपून जात आहे. बदलत्या हवामानामुळे हा परिणाम झाला आहे. वेळीच कीडीवर नियंत्रण आणण्यासाठी उत्पादकांना औषध फवारणीची गरज आहे. याची दखल घेऊन फलोत्पादन खात्याने काजू उत्पादक शेतकऱयांना मार्गदर्शन करून औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी उत्पादक शेतकऱयांतून होत आहे.