महाराष्ट्र भाजपमध्ये बदल होणार, चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होणार ही केवळ चर्चा ठरण्याची शक्यता आहे. तुर्तास दादांची विकेट वाचल्यातच जमा आहे.
गुगली टाकून एखाद्या विषय चर्चेत कसा ठेवावा हे महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून शिकावे! नाना पटोले यांनी राज्य सरकारकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे अशा आशयाचे वक्तव्य करावे आणि पुढचा बराच काळ त्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने चर्चेत राहावे. तातडीने नाना पटोलेनी खुलासा केला तरी त्या शंकेची हवा कायम राहावी. पाठोपाठ विजय वडेट्टीवार यांनी एखादी चर्चा उठवावी आणि त्यांनी चर्चेत रहावे असे प्रकार सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. मध्यंतरीच्या काळात मुंबईचे भाजपचे नेते आशिष शेलार यांचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील प्रेम उफाळून आले आणि वाफाळत्या चहाबरोबर दोघांनीही शिवसेना-भाजप युतीच्या शक्मयतांवरील चर्चेची बातमी चहाच्या घोटाबरोबर चघळली! तिथून शेलार यांचा जो दांडपट्टा सुरू झाला तो अगदी महाराष्ट्रभर फिरून, संपूर्ण राज्याचा पक्षांतर्गत तयारीचा अहवाल तयार करून, दिल्लीत अमित शहा यांना तो सादर करेपर्यंत आणि त्यातून त्यांचीच नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होण्याच्या चर्चेपर्यंत चालला. या दरम्यान दिल्लीला गेलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिली नाही. कामाचा व्याप असल्याने दादा त्यांना भेटू शकले नाहीत. पण त्यानंतर दादांवरील शहांची मर्जी कमी झाली, आता दादांना बदललेच जाणार अशी चर्चा सुरू झाली. दादांनी या चर्चेला सरपाटी बॉलप्रमाणे टोलवले. पण तोपर्यंत सुनील देवधर यांच्या एका ट्विटमध्ये संजय कुटे यांच्यापासून महाराष्ट्र भाजपचे कोर टीममधील अनेक नेते दिल्लीत एकत्र आल्याचा फोटो टाकला आणि दादांना हटवले जाणार अशी हवा गरम झाली. पाठोपाठ या प्रत्येक नेत्याशी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी चर्चा केल्याच्या बातम्या उठल्या. मग फडणवीस यांना नेमके कोण हवे आहेत? संजय कुटे यांचे नाव ते पुढे करणार की गडकरींशी जुळवून घेत बावनकुळे किंवा आशिष शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याची चर्चा झडली. त्यात गडकरींच्या दिल्लीतील घरी सर्वांनी भेट दिल्याचेही बोलले जाऊ लागले. गडकरींचे महाराष्ट्रातील व्यक्ती आणि पंतप्रधानपदाबाबतचे वक्तव्य आले. अशा सर्व पोषक चर्चेनंतरही भाजपमध्ये खरंच प्रदेशाध्यक्ष बदल होणार आहे का याबद्दल निश्चितपणे सांगता येणे सर्वांनाच अशक्मय आहे. एक तर लगेच मोठय़ा निवडणुका नाहीत. मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांनाही अजून बराच वेळ आहे. अशावेळी अचानक आणि उगाचच दादांना का बदलले जाईल? किमान बदलाची वातावरण निर्मिती करायला तरी पक्षाला दोन-चार महिने लागतील. ती अशी अचानक होऊ शकेल का याचा विचार केल्यास तुर्तास दादांच्या पदाला धोका निर्माण होईल असे वातावरण दिसत नाही. मात्र त्या निमित्ताने मराठा आरक्षण, घटना दुरुस्ती, या दुरुस्तीमागील कारणे, त्यातील भाजपचे यश-अपयश याबद्दलच्या चर्चेऐवजी दादांच्या पदावरच चर्चा होत राहिली. बंद खोलीआड भाजपने आपली विभागवार संघटनात्मक ताकद किती आहे, काय बदल हवा आहे याचा अंदाज घेतला. भाजपमध्ये मराठा आणि ओबीसी किती नेते आहेत याची पत्रकार आणि जनतेलाही उजळणी झाली. यापलीकडे काही होईल असे तुर्तास तरी दिसत नाही. पुढच्या काही काळासाठी तरी दादा आपली विकेट वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. किंवा त्यांची विकेट धोक्मयात नसतानाच केवळ अपीलद्वारे वातावरण निर्मिती झाली आणि पंचांनी मान फिरवून सर्वांना परतवले असे म्हणता येईल!
राष्ट्रवादीची नवाबी गुगली!
भाजपची अशी हवा सुरू असताना राष्ट्रवादीने खळबळ निर्माण केली नाही असे होणारच नाही. तशी खळबळ माजवण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक यांनी करून पाहिला. मुंबई काँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणूक लढवेल अशी चर्चा थांबल्यानंतर काँग्रेसचे नेते आपल्या इतर कामाकडे वळले आहेत. दिल्लीत काँग्रेसने आयोजित केलेल्या ब्रेकफास्टला उपस्थित राहिलेल्या संजय राऊत यांच्या खांद्यावर राहुल गांधी यांनी हात ठेवला. त्यामुळे त्या छायाचित्राची हवा काही दिवस चालली. यावर बरीच चर्चाही घडली. काँग्रेस आणि शिवसेनेचे हे जवळ येणे कारण नसताना अनेकांच्या भुवया उंचावून गेले. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक वक्तव्य केले. या निवडणुका स्थानिक पातळीवरील नेते स्थानिक परिस्थिती पाहून कुणाशी जुळवून घ्यायचे हे ठरवून लढवतील असे जाहीर केले. मात्र ही घोषणा ‘नवाबी’ ठरली. डोक्मयावरून गेली. म्हटले तर या घोषणेतून आघाडीचा बेबनाव दिसून येतो. तीन पक्ष अजूनही मनाने एकत्र नाहीत असेच या वक्तव्यातून समजून येते. पण, ही एक मोठी ब्रेकिंग न्यूज हवेतच विरली! यावर शिवसेनेतून एखादी स्फोटक प्रतिक्रिया आली असती तर त्याची बरीच हवा राहिली असती. शिवसेना खासदारांनी राष्ट्रवादी बाबत एक वक्तव्य केले. मात्र तेही असेच हवेत विरले.
प्रत्यक्षात चर्चा व्हायला महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत. मराठा आणि ओबीसी च्या आरक्षणाबाबत गांभीर्याने काही चर्चा होण्याची आवश्यकता आहे. नव्या घटनादुरुस्तीने फारसे काही साध्य होणार नाही हे सत्ताधारी पक्ष सांगत असला आणि विरोधी पक्ष त्यावरही सरकारला काही करायचेच नाही. ही केवळ बहाणेबाजी आहे असे म्हणत असला, तरी त्यातून प्रश्नांची तड लागणार नाही. केवळ हवेवर दिवस काढण्यापेक्षा राजकीय पक्षांनी काही ठोस करून दाखवणे आवश्यक आहे. ते करता येत नसल्यानेच ब्रेकिंग न्यूजच्या आधाराने आपापल्या पक्षातील टीआरपी असणारे नेते कॅमेऱयासमोर उभे करून राजकीय पक्ष मात्र त्यांना अधिक चर्चित चेहरे बनवत आहेत!
शिवराज काटकर