सोन्याळ / वार्ताहर
सांगलीच्या पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे बदली सफाई कर्मचारी म्हणून कै. लक्ष्मण कृष्णा चव्हाण, कै. मोहन विलास देवकुळे, कै. सागर गणपती मोरे, व कै. रुपेश अरुण मोरे यांना सेवेत नियमित न केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय झाला असून संबंधित मयत कर्मचारयांची सेवा नियमित करून त्यांच्या वारसाना अनुकंपा किंवा वारसा हक्काने वर्ग 4 या पदावर नियुक्ती देण्याबाबतचे निवेदन राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्या नेतृत्वाखाली काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने देण्यात आले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बदली सफाई कर्मचारी यांना घेण्याबाबत सांगलीच्या पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाला निर्देश दिलेनुसार आतापर्यंत 115 लोकांना सेवेमध्ये घेण्यात आले आहे. शासन निर्णयांनुसार बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे बाबतची जबाबदारी अधिष्ठाता यांची आहे. अनेक कर्मचारी 15 ते 20 वर्षे बदली कर्मचारी म्हणून काम केले आहे. यामधील बरेच कर्मचाऱ्यांना नियमित केले आणि त्यामधील अनेक कर्मचाऱ्यांना नियमित केले नाही.
यामधील अनेक कर्मचारी हे कर्तव्यावर असताना मयत झाले आहेत. यामधील अनेक कर्मचारी अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय आहेत. सदर मयत कर्मचारी यांना नियमित न केल्यामुळे त्यांच्या वारसांच्या कुटुंबावर अन्याय झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन निर्णयाप्रमाणे वरील चारही कर्मचाऱ्याना त्यांची सेवा नियमित करून त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात कार्यवाही करणेत यावी ,अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे. अशी माहिती वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली. यावेळी जिल्हा सचिव बाबासाहेब माने, संघटक सचिव विजयकुमार नलवडे, मुख्यसंघटक संदेश बोतालजी, गणेश काकडे उपस्थित होते.