पक्षाच्या घोषणेशिवायच रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश : तरुणाई, सुशिक्षित कार्यकर्त्यांवर असणार भर
वृत्तसंस्था / चेन्नई
सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातील स्वतःच्या प्रवेशासंबंधी गुरुवारी चेन्नई येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे. रजनीकांत यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची घोषणा केली नसली तरीही राजकारणासंबंधी स्वतःच्या योजना मात्र मांडल्या आहेत. तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आपण कधीच पाहिले नाही, केवळ राजकारणात बदल घडवून आणण्याची इच्छा असल्याचे रजनीकांत यांनी म्हटले आहे.
सरकार आणि पक्षप्रमुख भूषविणारे व्यक्ती वेगळे असतील आणि स्वतंत्रपणे काम करतील असा पक्ष स्थापन केला जाणार आहे. तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता आणि करुणानिधी हे दिग्गज नेते होते. पण त्यांच्या निधनानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. बदल घडवून आणण्यासाठी नवे आंदोलन उभे करावे लागणार असल्याचे उद्गार रजनीकांत यांनी काढले आहेत.
नव्या नेतृत्वाची आस
नव्या पक्षात तरुणाई आणि सुशिक्षितांना संधी देऊन तामिळनाडूत नवे नेतृत्व करण्याचा विचार आहे. या कारणामुळेच मी कधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे रजनीकांत यांनी म्हटले आहे. रजनीकांत यांच्या दुहेरी योजनेनुसार पक्षात दोन विभाग असतील. एक विभाग पक्षाचे तर दुसरा सरकारचे कामकाज हाताळणार आहे. पक्ष सरकारवर वरचढ होणार नसल्याचे सुपरस्टार म्हणाले.
सरकारला जाब विचारणार
पक्ष स्वतःच्या सरकारलाही जाब विचारणार आहे. काही चुकीचे घडल्यास पक्ष संबंधिताच्या विरोधात कारवाई करण्यास हयगय करणार नाही. परंतु आम्ही समांतर सरकारही चालविणार नाही. आमच्याकडे मर्यादित संख्येत लोक असून त्यांचा योग्यप्रकारे वापर करणार आहोत. जनतेसाठी तयार केलेल्या योजना लवकरच मांडणार आहोत. यासंबंधी नेते, पत्रकार आणि अधिकाऱयांशी चर्चा केली असली तरीही कुणीच त्यांची अंमलबजावणी करण्यास तयार झालेला नाही, पण आम्ही पक्षाच्या योजनेवर काम करत राहू असे त्यांनी म्हटले आहे.
मुन्ना, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला ही आता है……..
2007 मध्ये प्रदर्शित ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातील रजनीकांत यांचा प्रसिद्ध डायलॉग त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर चपखलपणे लागू होतो.
पक्षाचा 3 सूत्री कार्यक्रम
1 निवडणुकीच्या काळात आवश्यक असणारी पण उर्वरित काळात भ्रष्टाचाराला बळ देणारी अनावश्यक पदे पक्षात समाविष्ट नसतील. अशा पदांवर असलेल्या लोकांना त्यांच्या सेवेच्या ऐवजात निविदा आणि कंत्राटे दिली जातात, असे प्रकार रोखले जाईल.
2 पक्षातील 60-65 टक्के पदांवर तरुण-तरुणी, सुशिक्षित आणि चांगली पार्श्वभूमी असलेले लोक असतील. उर्वरित पदांवर माजी न्यायाधीश, निवृत्त अधिकारी नेमले जातील. या लोकांना समाजसेवेचा इतिहास असण्यासह त्यासंबंधीचा ध्यास असणार आहे.
3 द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या उलट सरकार आणि पक्षाचा प्रमुख एकच व्यक्ती नसेल. तर पक्षात दोन्ही पदांवरील व्यक्तींदरम्यान स्पष्ट अंतर असणार आहे. सरकारच्या कामगिरीवर नजर ठेवू, पण कामकाजात हस्तक्षेप नाही.