उर्दूमधील अत्यंत महत्त्वाचे कवी आणि समीक्षक शम्स उर रहमान फारूकी यांचं वयाच्या 85व्या वषी कोरोनामुळे अलाहाबाद इथं निधन झालं. कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन ते बरे झाले होते. आपल्या अलाहाबादमधील मूळ घरी परतण्याची त्यांना आस होती. ते घरी परतले आणि त्यानंतर अर्ध्या तासातच ते हे जग सोडून गेले. उर्दू भाषा व साहित्याशी ज्यांचा परिचय आहे, त्यांना फारु˜ाढाr यांचे नाव माहीतच असते. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1935 रोजी उत्तर प्रदेशात झाला. उर्दूमध्ये कथाकथनाची ‘दास्तानगोई’ ही मौखिकी परंपरा सोळाव्या शतकापासून प्रचलित आहे. या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचं श्रेय फारूकी यांना जातं. कई चाँद थे सरे आसमान, गालिब अफसाने की हिमायत में. द सन दॅट रोझ फ्रॉम दी अर्थ ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं. 18व्या शतकातील विश्वविख्यात कवी मीर ‘मीर’ याच्यावरील चार खंडातील त्यांचा ‘शेर ए शोर अंगेज’ हा ग्रंथ मौलिक दस्तावेज आहे. उर्दू व इंग्रजीत लेखन केलेल्या फारू˜ाढाr यांना पद्मश्री आणि सरस्वती सन्मान मिळाले होते. कवी, कादंबरीकार, समीक्षक, साहित्य इतिहासकार, अनुवादक, संपादक, प्रकाशक, प्राध्यापक आणि साहित्यातील आधुनिकतावादी… फारूकी यांच्या व्यक्तित्वाची ही वेगवेगळी रूपं. गंमत म्हणजे, इतकं सगळं असूनही 1994 सालपर्यंत हे सद्ग्रहस्थ भारतीय टपाल सेवेत नोकरी करत होते. सरकारी सेवेत राहूनही त्यांनी केवढी साहित्यिक कामगिरी करून ठेवली आहे, पहा. 1966 ते 2006 अशी 40 वर्षं फारूकी यांनी ‘शबखून’ हे मासिक चालवलं. सातत्यानं नवमतवादी साहित्य त्यांनी प्रसिद्ध केलं. ‘हमें हुस्न का मायार (स्तर) बदलना होगा,’ असं प्रेमचंद यांनी म्हटलं होतं. उर्दूतील प्रगतिशील वाङ्मयाचं ते घोषवाक्मयच बनलं. परंतु प्रगतिशील साहित्य चळवळीमुळे उर्दू साहित्याची हानीच झाली, असं त्यांचं मत होतं. ‘शबखून’द्वारे त्यांनी उर्दू साहित्याला सौंदर्यभान देण्याचं कार्य केलं. प्रसिद्ध उर्दू शायर फैज अहमद ‘फैज’ यांच्यावरही फारूकी यांनी टीकेची झोड उठवली होती. भावनांची समज उत्तम असल्यामुळेच केवळ फैज इतरांना आकर्षून घेत, असं फारू˜ाढाr म्हणत.
त्यांनी ‘तफहीम ए गालिब’ हा मौलिक ग्रंथ लिहिला. ते अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठात अतिथी प्राध्यापक होते. त्याच काळात त्यांनी ‘अर्ली उर्दू लिटरेचर, कल्चर अँड हिस्टरी’ हा ग्रंथ लिहिला. उर्दू भाषेच्या उगमाबद्दलची आपली वेगळी मतं त्यांनी त्यात मांडली आहेत. उर्दू भाषा ही लष्करी छावणीतून जन्मली, असं बरीच वर्षं मानलं जातं. उर्दू हा शब्द मुळात तुर्की भाषेतील आहे. मात्र फारूकी यांच्या मते, उर्दू भाषा दिल्लीत मुगलांच्या दरबारी संस्कृतीत घडली व फोफावली. ‘जबान ए उर्दू ए मुअल्ला ए शहाजहानाबाद’, अर्थात ‘शहाजनाबादेतील (दिल्ली) उन्नत वर्तुळातील छावणीची भाषा’ असं तिचं वर्णन ते करतात. म्हणूनच 19व्या शतकातील मध्यापर्यंतचे गालिबसकट अनेक शायर तिचा उल्लेख उर्दू असा न करता, तिला रेखता, हिंदवी, किंवा हिंदी म्हणत, असं फारू˜ाढाr यांनी लिहिलं आहे. ते अलाहाबाद विद्यापीठातील इंग्रजी साहित्याचे विद्यार्थी. इंग्रजीत एम. ए. करत असताना, पाश्चात्य समीक्षकी शैलीचाही त्यांना परिचय घडला. त्याचवेळी इंग्लिशवाल्यांची ढोंगबाजीही त्यांच्या लक्षात आली. हे वसाहतवादातून आलेलं ढोंग होतं. त्याचं जवळून दर्शन घडल्यामुळे साहित्याचे पाश्चात्यांचे मापदंड झुगारण्याची हिंमतही ते दाखवू शकले. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रमात झालेल्या हानीमुळे भारतातील सांस्कृतिक, सामाजिक जीवनावरही परिणाम झाला होता. आपल्या सांस्कृतिक व साहित्यिक परंपरा या कमअस्सल आहेत, असं उगाचच अनेक भारतीयांना वाटू लागलं होतं. गजल तसंच दास्तानगोई यांच्याकडे तुच्छतेने बघितलं जात होतं. आपला भाचा मेहमूद याच्यासमवेत फारूकी यांनी दास्तानगोईचं पुनरुज्जीवन केलं. मेहमूद हा दानिश हुसैन यांच्याबरोबर रंगभूमीवर दास्तानगोईचे प्रयोग करत असे. फारूकी यांनी ‘दास्तान ए अमीर हमजा’वर बरंच संशोधन केलं.
मुगल ऐतिहासिक काळावरील फारू˜ाढाr यांची ‘कई चाँद थे सरे आसमान’, ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. त्यांनी स्वतःच तिचा इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यात त्या काळातील शायर गालिब, दाग अशांच्या व्यक्तिरेखाही आहेत. ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या नारायण मूर्ती यांचे चिरंजीव रोहन मूर्ती यांनी सुरू केलेल्या प्रकल्पासाठी त्यांनी मीरच्या शायरीचा अनुवादही केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही कन्या (मेहर अफशान आणि बारान) या अध्यापन व साहित्य क्षेत्रातच कार्यरत आहेत. मेहेर अफशान यांनी तर मिर्जा
गालिब साहित्यिक चरित्र लिहिलं असून, लवकरच पेंग्विनतर्फे ते प्रकाशित होणार आहे.
उर्दू साहित्याच्या आकृतिबंधास आधुनिक वळण देण्याचं काम त्यांनी केलं. पूर्वी मीरच्या जीवन व साहित्याचा वेध नैतिक चौकटीतच घेतला जात होता. फारू˜ाढाr यांनी तो पूर्णपणे आधुनिक साहित्यिक दृष्टिकोनातून घेतला. आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे, फारू˜ाढाr यांनी ‘इब्ने सफी’ सारख्या गुप्तहेर कथाही लिहिल्या. कई चाँद.. या कादंबरीत त्यांनी 19व्या शतकातील वजीर खन्नून या महिलेची कथा सांगितली आहे. दैनंदिन जीवनातील काव्याचं चित्रणही या कादंबरीतून घडलं आहे. प्रेम आणि विश्वासघाताची ही कथा आहे. ज्या अलाहाबादेत फारू˜ाढाr यांनी शेवटचा श्वास घेतला, त्या नगरीत अकबर अलाहाबादी, हरिवंशराय बच्चन, धर्मवीर भारती, रफीक हुसैन, इब्ने सफी, मुस्तफा जैदी हे उर्दू व हिंदी साहित्यिक वाढले आणि घडले. फारू˜ाढाr हे उर्दू भाषा आणि साहित्याकडे नव्या दृष्टीने पाहत आले. इंग्रजीमुळे आलेल्या समीक्षकी अवडंबराला नाकारून त्यांनी उर्दू समीक्षेला नवी परिभाषा दिली. भाषेबाबतची त्यांची खास अशी मतं होती. ती त्यांनी नेहमीच आग्रहाने मांडली. इतिहासाकडे वळून न पाहण्याची भूमिका त्यांना मंजूर नव्हती. इतिहासात सापडणारे अनेक धागेदोरे वर्तमानाशी निगडित असतात, असं त्यांना वाटे. स्वतःच्या वाटेवर चालणारा हा माणूस होता. मळलेली वाट रूढ आहे म्हणून ती डोळे झाकून स्वीकारण्याची त्यांची वृत्ती नव्हती.
नंदिनी आत्मसिद्ध
(निरोपाचा लेख)