ऑनलाईन टीम / मुंबई :
देशातील काळा पैसा संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे बोगस नोटाही संपतील असा मोदींचा दावा होता. मात्र, महाराष्ट्रात बनावट नोटांची फारशी प्रकरणे समोर आली नाहीत. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात नोटांचा खेळ सुरू होता. 8 ऑक्टोबर 2017 ला बीकेसीमध्ये पकडण्यात आलेल्या बनावट नोटांचे प्रकरण मिटविण्यासाठी फडणवीस यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मदत घेतली होती, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मलिक म्हणाले, 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी झाल्यानंतर 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आले नाही. कारण देवेंद्र फडणवीसांचे त्याला संरक्षण होते. 8 ऑक्टोबर 2017 रोजी बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकला. त्यामध्ये 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटय़ा सापडल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मदत घेतली. 14 कोटी 56 लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख 80 हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात दोघांना अटक करण्यात आली होती. काही दिवसातच त्यांना जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही, असे असेही मलिक म्हणाले.