कोरोनाकाळात अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या आहेत. तथापि, कल्पक बुद्धीच्या काही युवकांनी या स्थितीचाही फायदा घेऊन नवे व्यवसाय सुरू केले. आणि नोकरीमधून आयुष्यभरात मिळाले नसते इतके पैसेही कमावले. अशा युवकांपैकी एक बिहारच्या मधुबनी जिल्हय़ातील रहिवासी मनीष कुमार आहेत. शिक्षणाने मरीन इंजिनियर असणाऱया मनीष यांनी कोरोनाकाळात नोकरी गमावल्यावर लोकल मार्केटिंगच्या संदर्भातील व्यवसाय सुरू केला आणि तीन महिन्यांमध्ये दीड कोटीची उलाढाल साध्य केली.
2019 मध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. नंतर सहा महिने एका जहाजावर काम केले. तेथे त्यांना अनेक नव्या बाबी शिकावयास मिळाल्या. चांगल्या नोकरीची ऑफरही आली. काही काळ नोकरी केली, तथापि नंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नोकरी सोडावी लागली. कारण नोकरीच्या ठिकाणी जाणे अशक्य झाले होते. मात्र, धीर न सोडता त्यांनी स्थानिक नागरिकांना उपयुक्त ठरेल, अशा व्यवसायाचा शोध घेतला.
परिस्थितीचा अभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले, की शहर भागांमध्ये लोक लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन खरेदीवर भर देत होते. त्यांना आवश्यक त्या वस्तू घरपोच मिळत होत्या. तथापि, छोटी शहरे आणि ग्रामीण भागात डिलिव्हरी देण्यास ऑनलाईन शॉपिंग कंपन्या तयार नसतात, हे देखील त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी तसा व्यवसाय सुरू केला. त्यांनी विचारपूर्वक एक असा प्लॅटफॉर्म तयार केला, की ज्यातून छोटी शहरे आणि ग्रामीण भागातही मार्केटिंगची चेन विकसित होईल. अल्पावधीतच त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. आणि त्यांच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग अनेक छोटे व्यापारी आपला माल ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी करू लागले. त्यांनी आपले सेवाशुल्कही कमी ठेवल्यामुळे प्लॅटफॉर्मच्या उपयोगकर्त्यांची संख्या वाढली. अशा प्रकारे अल्पावधीतच त्यांनी आपला व्यवसाय भरभराटीला आणून युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.