वारणा कापशी / सुखदेव पाटील
गेल्या वर्षी याच दिवसात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरवात झाली होती. तेव्हा चिकनच्या बाबतीत उठलेल्या अफवामुळे कोंबड्यांचा आणी त्यांचे पालन ,व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा आर्थिक बळी गेला होता. आता पुन्हा बर्ड फ्लुचा प्रसार होत असल्याने अनेक ठिकाणी कोंबडया, कावळे व अन्य पक्षांचा मृत्यू होत असल्याने कुक्कुटपालन करणारे शेतकरी अडचणीत येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोना नंतर अचानक आलेल्या बर्ड फ्लुच्या संकटाचा सामना करण्याचे आवाहन या व्यवसाईका समोर आले आहे.
शाहुवाडी तालुक्यात काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.कुक्कुटपालन व्यवसाय हा जुगाराच्या खेळाप्रमाणे व्यवसाय आहे. कारण या व्यवसायात कोंबड्यांचा अतिषय काळजीपुर्वक सांभाळ करावा लागतो. वेळोवेळी लसीकरण, औषधोपचार, पशुखाद्य आदी बाबीवर खर्च करावा लागतो. त्यामुळे या व्यवसायात तोट्याची जास्त शक्यता असते. तरीही शेतकरी आजही हा व्यवसाय करत आहे. गेल्या वर्षी याच दिवसात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती. चिकन खाल्याने या रोगाचा प्रसार होतो अशा अफवांचा बाजार यावेळी उठला होता. तेव चिकनच्या विक्रीत मोठया प्रमाणात घट झाली होती.विक्रीस आलेल्या कोंबडया सांभाळणे व्यवसाईकांना अधिक आर्थिक कचाट्यात घेवुन जात होते. तेव्हा काही व्यवसाईकांनी कोंबडया काडीमोलाने विकल्या तर काहींनी गाडून टाकल्या. व शेड रिकामी केली. त्या तोटयातून सावरत त्यांनी व्यवसायास नवीन सुरवात केली तोपर्यंत या वर्षी बर्ड फ्लुच्या संकटाने आक्राळ विक्राळ जबडा पसरला आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय पुन्हा अडचणीत आला आहे.