मध्यप्रदेशात कोंबडी, अंडी विक्रीस 15 दिवस बंदी
थिरूवनंतपुरम / वृत्तसंस्था
अगोदरच कोरोनाशी झुंजणाऱया केरळमध्ये आता बर्ड फ्ल्यू या आजाराचा उद्रेक वाढीला लागला आहे. कोट्टायम आणि अलाप्पुझा या जिल्हय़ांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आह. याच दोन जिल्हय़ांमध्ये 50 हजार पक्ष्यांची कत्तल करण्याची योजना असून या योजनेला पर्यावरण स्नेहय़ांकडून विरोध होत आहे.
मध्यप्रदेशमध्येही या आजाराचे रूग्ण वाढत असल्याने तेथे राज्यभर कोंबडी आणि अंडी विक्रीवर 15 दिवसांकरिता बंदी घालण्यात आली. बर्ड फ्ल्यू हा विकास पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहचतो. बाधित पक्ष्याचे मांस खाल्ल्यास माणसाला याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
ग्रामीण भागातही प्रसार
अलाप्पुझा जिल्हय़ाच्या कुट्टानाड भागातील चार ग्रामपंचायतींच्या प्रदेशांमध्ये या रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या भागांमध्ये प्रथम कावळे व काही पक्षी या रोगाने मरून पडल्याचे आढळले. त्यांची तपासणी केली असता ते या रोगाने बाधित असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे नागरीकांना त्वरित सावध करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात दक्षता बाळगण्याचा इशारा देण्यात आला.
पक्ष्यांचा संपर्क टाळा
बाधित पक्ष्याची विष्ठा, त्याची चोच, नाक किंवा डोळय़ातून गळणारे द्रवपदार्थ आदींच्या संपर्कात माणूस आल्यास त्याला या रोगाची बाधा होऊ शकते. त्यामुळे पक्षीपालकांनी पक्ष्यांच्या संपर्कात येण्याचे त्वरित थांबवावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, सरसकट पक्ष्यांच्या कत्तली करण्याचे कारण नाही, असेही तज्ञांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले असून तसे आवाहनही केले आहे.
रोग सरसकट जीवघेणा नाही
बर्ड फ्ल्यू हा रोग झपाटय़ाने पसरणारा असला तरी तो सरसकट जीवघेणा नाही. तसेच या रोगावर उपचार करून तो बरा केला जाऊ शकतो. त्यावर औषध उपलब्ध असल्याने फार चिंता करण्याचे कारण नसते, असे तज्ञांचे मत आहे. मात्र लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आणि उपचार योग्य वेळी न घेतल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे दक्षतेला पर्याय नाही, असेही बजावण्यात आले आहे.