बांगलादेशमधील दुर्घटनेवेळी बोटीमध्ये होते जवळपास एक हजार प्रवासी
ढाका / वृत्तसंस्था
बांगलादेशातील झलकाठी जिल्हय़ात शुक्रवारी सकाळी एका फेरीबोटीला आग लागली. या दुर्घटनेत बोटीतील 36 जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. या थरारक बर्निंग बोट दुर्घटनेत ‘ओबिजान’ ही तीनमजली बोट भस्मसात झाली. आग लागली त्यावेळी बोटीवर सुमारे 1,000 जण होते. सदर बोट सुगंधा नदी ओलांडून ढाकाहून बरगुना जिल्हय़ात जात असताना आगीची घटना घडल्याची माहिती झलकाठी जिल्हय़ाचे अतिरिक्त उपायुक्त मोहम्मद नजमुल आलम यांनी दिली.
बांगलादेशची राजधानी ढाकापासून 250 किमी अंतरावर असलेल्या झलकाठी गावाजवळ शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 36 मृतदेह बाहेर काढले आहेत, मृतांची संख्या वाढू शकते, असे स्थानिक पोलीस प्रमुख मोइनुल इस्लाम यांनी सांगितले. बोटीला आग लागल्यानंतर होरपळून आणि धुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तर काहींनी बचावासाठी नदीत उडी मारल्यामुळे बुडून जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. आग इंजिन रूममधून सुरू झाली आणि नंतर संपूर्ण फेरीत पसरली, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीत जखमी झालेल्या 200 लोकांना आम्ही रुग्णालयात दाखल केले आहे. पहाटे काळोख असताना ही दुर्घटना घडल्यामुळे बचावासाठी लोकांना अधिक संधी न मिळाल्याने जीवितहानीचा आकडा वाढल्याचे सांगण्यात आले. तरीही मदत व बचावकार्य वेगाने हाती घेण्यात आल्याने शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले.
पोहून जात काहींनी गाठला किनारा
पहाटे तीनच्या सुमारास इंजिन रुममध्ये आग लागली आणि ती वेगाने पसरली. याप्रसंगी लहान मुले आणि वृद्धांसह बरेच प्रवासी मोठय़ा संख्येने बोटीत उपस्थित होते. अनेकांनी पाण्यात उडय़ा मारून किनाऱयावर पोहोचण्यात यश मिळविले. बांगलादेशात गेल्या काही काळापासून असे अपघात होत आहेत. यापूर्वी जुलैमध्ये ढाक्मयाबाहेरील औद्योगिक शहर रुपगंजमधील अन्न आणि पेय कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 52 लोकांचा मृत्यू झाला होता.