माजी हॉकीपटूंची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकतेच दिवंगत झालेले माजी महान हॉकीपटू बलबिंर सिंग सिनियर यांना त्यांच्या कारकिर्दीत योग्य तो बहुमान मिळाला नसल्याने त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करून त्याची भरपाई करावी, अशी मागणी माजी हॉकीपटूंनी केली आहे.
बलबिर सिंग सिनियर यांनी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके पटकावली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषक हॉकी स्पर्धाही जिंकली होती. सोमवारी त्यांचे मोहाली येथे 96 व्या वर्षी निधन झाले. मेजर ध्यान चंद यांना हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ गाजविला होता. पण स्वातंत्र्यानंतरचा काळ हा बलबिर सिंग यांनी गाजविला. ध्यान चंद यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण बलबिर सिंग यांना 1957 मध्ये पद्मश्री हा एकमेव पुरस्कार देण्यात आला होता. ‘दादा ध्यान चंद व बलबिर सिंग दोघेही भारताचे महान क्रीडापटू आहेत. दोघेही सारख्याच तोलामोलाचे असून त्यांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. जर ध्यान चंद भारतीय हॉकीचे पितामह आहेत तर बलबिर सिंग यांना काका म्हणायला हवे,’ असे 1975 मधील विश्वचषक विजेत्या हॉकी संघाचे कर्णधार अजित पाल सिंग म्हणाले.
‘ध्यान चंद यांचा आम्ही विविध प्रकारे सन्मान केलेला आहे. त्यांच्या नावे स्टेडियम आहे तर त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याशिवाय त्यांच्या नावे पुरस्कारही दिला जातो. पण बलबिर सिंग सिनियर यांना असा मान कधीच मिळालेला नाही. त्यामुळे ध्यान चंद व बलबिर सिंग या दोघांनाही भारतरत्नचा बहुमान मिळणे आवश्यक आहे. ते आमचे राष्ट्रीय हिरो असून अनेक पिढय़ांना त्यांनी प्रेरित केले आहे आणि यापुढेही ते प्रेरणा देत राहतील,’ असेही अजित पाल सिंग म्हणाले. अशाच भावना ध्यान चंद यांचे पुत्र व हॉकीपटू अशोक कुमार, माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनीही व्यक्त केल्या. ध्यान चंद व बलबिर सिंग हे राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचा यथोचित सन्मान केला जावा, असे तिर्की याप्रसंगी म्हणाला.