प्रतिनिधी /सांगे
ग्रामीण भागांतील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांनाही दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमोणे-पैंगीण येथील बलराम शिक्षणसंस्थेचे बलराम निवासी विद्यालय प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर यांच्या नेतृत्वाखाली काही शिक्षकांनी नुकतीच सांगे तालुक्मयातील अतिशय दुर्गम अशा कर्ला गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी पालकांकडून शिक्षणासंबंधी असलेल्या समस्या जाणून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
गावात प्राथमिक शाळा आहे. पण येथील विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तास-दीड तास पायपीट करावी लागत असल्याचे पालकांनी मुख्याध्यापिकेच्या लक्षात आणून दिले. यावेळी तवडकर यांनी बलराम विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यालयातर्फे वर्षभर राबविल्या जाणाऱया विविध उपक्रमांची माहिती देण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात विद्यालयातील शिक्षकांनी नेत्रावळीतील साळजिणी, तुडव, वेर्ले, पाटवाडा, भाटी तसेच खोतीगावातील नडके, येडा आणि पैंगिणीतील मार्ली-तिर्वाळ या दुर्गम गावांत जाऊन दिलेल्या शिक्षणाची सविस्तर माहिती दिली.
खास आदिवासी समाजातील आणि गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास नजरेसमोर ठेवून आमोणे-पैंगीण येथे माजी मंत्री रमेश तवडकर यांच्या पुढाकारातून काही युवकांनी एकत्र येऊन बलराम शिक्षणसंस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या बलराम निवासी विद्यालयाच्या सुसज्ज आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांनी युक्त अशा इमारतीचे काम पूर्ण झाल्याचे सविता तवडकर यांनी पालकांच्या नजरेला आणून दिले आणि बलराम विद्यालयात उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
रस्त्याची दुरवस्था
केपे आणि सांगे तालुक्मयाच्या डोंगराळ भागात कर्ला हा गाव वसलेला आहे. येथील रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून गावात ये-जा करणे धोकादायक बनले आहे. रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी अनेक वेळा करूनही सरकारच्या संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावात विजेचा लपंडाव चालत असल्याने स्थानिक पुरते हैराण झाले आहेत. उन्हाळय़ाच्या दिवसांत त्यांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. नुकतीच आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी सरकारी अधिकाऱयांच्या ताफ्यासह कर्ला गावाला भेट देऊन समस्या सोडविण्याच्या बाबतीत ग्रामस्थांना आशेचा किरण दाखविला आहे.