प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाने अगोदरच बळीराजावर सकंट आले आहे. तरीही सगळय़ांचा तारणहार बळीराजा खचून न जाता आपल्या जवळच्या शेतीत कष्ट करत राहिला. हाताला आलेल्या पिकांची दैना तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने केली आहे. ज्वारीची कणस ताटावरच उगवली आहेत. भुईमूगाच्या शेंगा जमिनीत कुजून गेल्या आहेत. भाताचे तर वाळवाणच झाले आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे करण्यासाठी एवढय़ा भयंकर अटी आहेत. त्या अटी पूर्ण करता करता सुगीच्या दिवसात वाया गेलेले पिक काढण्याचे काम सोडून पंचनामे करण्याची लगबग जिह्यात सुरु आहे. पंचनामे करण्यासाठीही शेतकऱयाकडे स्मार्ट फोन हवा आहे, फोटो कॉपी काढली पाहिजे, त्यासाठी शेतकऱयांची चांगलीच तारांबळ उडत होती. त्यातच आज शेवटचा दिवस पंचनाम्याचा होता.
कोरोनामुळे अगोदरच शेतकरी हतबल झाला आहे. काही ठिकाणी घरातले कोण ना कोण कर्त माणूस आजारी असल्याने बळीराजा सुगीच्या दिवसात चितांग्रस्त असल्याचे दिसत होते. तर कशीबशी शेती करुन त्यातून पोटापुरते उत्पन्न काढण्यासाठी राबत होते. पिक हातातोडांशी आले असतानाच अस्मानी संकटाने तीन दिवसांपूर्वी घात केला. हैद्राबाद मार्गे आलेले वादळ सातारा जिह्यात नुकसान करुन गेले. ऐन सुगीच्या दिवसात सगळाच घोटाळा निसर्गाने केला. भुईमूगाचे डहाळे म्हणजेच वेल कुजले. शेंगा तर जमिनीत कुजल्या, सोयाबीन वाहून गेला. भिजला. भाताचे सगळेच वाळवाण झाले. ज्वारीच्या कणसांना ताटावरच उगवण लागली. काळी कणसे पडली. कडबा पुर्णपणे कुजून गेला. जिह्यात शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले असताना सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लगेच पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्याचे आदेश मिळताच कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवकांनी गावागावात तळ ठोकला आहे. परंतु पंचनाम्या करता मुदत फक्त सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे पंचनाम्यांसाठी स्वतः शेतकरीच वाया गेलेल्या पिकांचे फोटो काढण्यासाठी कोणाकडे ऍन्डरॉईड मोबाईल आहे त्यांच्या हातापाया पडून शेतात घेवून जात आहे. त्या शेतात नोट कॅम या ऍपवर फोटो काढून त्या फोटोची हार्ड कॉपी घेवून पुन्हा सातबारा खाते उतारा, पंचनाम्याचा अर्ज, बॅक पासबुकची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स देवून स्वतःच पंचनामा शेतकरी करत आहे. जिह्यात गावोगावी हीच परिस्थिती आहे. सरकारकडून मदत मिळेल या आशेने वाया गेलेल्या पिकाकडे डोळे भरुन पहात स्वतः पंचनामे करुन शेतकरी देत आहे. कृषी सहाय्यक, तलाठी हे कार्यालयात आलेल्या कागदपत्रांची छाननी करुन घेत आहे. त्यातच पुढाऱयाने त्या अधिकाऱयाचे कान भरले की दिलेले कागदपत्रे बाजूलाच ठेवण्याचे प्रकार घडतात.
लवकर भरपाई मिळावी
शासनाने आम्हाला लवकरच भरपाई मिळावी. जेणेकरुन काहीतरी आम्हाला मिळेल. पंचनाम्यासाठी मुदतवाढ दिली गेली नाही. आम्ही कसं जगायचे हे मायबाप सरकारने सांगावं.
शिवराम सपकाळ केळेवाडी खालची
एक फॉर्म आणि पाच वाडय़ा
पंचनाम्याला गावात आलेल्या अधिकाऱयांने शेतकऱयांकडे कार्यालयात गेल्यावर एकच दिला. शनिवारी, रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने उतारे भेटले नाहीत. त्यामुळे शेतकऱयांची सोमवारी पंचायत झाली होती.